

मुंबई: मुंबईचा पारा पस्तीशीच्या घरात असून झळा मात्र चाळीशीच्या बसत आहेत. याचा पशुपक्ष्यांनाही त्रास होत आहे. डिहायड्रेशनमुळे मार्चपासून बैल घोडा रुग्णालयात दोनशे पशुपक्ष्यांना उपचारांसाठी दाखल करावे लागले आहे.
पक्षी आकाशात संचार करत असताना रस्त्यावर, झाडांच्या फाद्यांवर, विजेच्या तारांवर अडकून पडत आहेत. त्यात त्यांचा जीव जाण्याच्या घटनाही घडत आहेत. एप्रिल महिन्याच्या आकडेवारीनुसार परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात 46 घारी, 35 कबुतरे, 15 कावळे, 2 पोपट, 2 बदक,2 मैना यांना उपचारांसाठी दाखल केले. यात घारी, कबुतरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय 15 भटक्या कुत्र्यांवरही उपचार करण्यात आले आहेत.
उष्णतेमुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने पक्षी, प्राणी डिहायड्रेट होत असल्याने ते जमिनीवर कोसळत आहेत. चिमणी, कावळा असे निपचीत पडले तर इतर प्राणी त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. त्यामुळे जखमी झालेले पक्षी रुग्णालयात दाखल होत आहेत.
भटक्या व पाळीव प्राण्यांनाही उन्हाचा फटका बसला आहे. विशेषतः कुत्रे आणि मांजरींवर सर्वाधिक परिणाम झाला होता. निर्जलीकरण आणि पोटाशी संबंधित समस्यांमुळे प्राण्यांना दाखल करण्यात आले आहे.
पशू पक्ष्यांसाठी हे करा!
उन्हाळ्यात मटण किंवा चिकनसारखे गरम खाद्यपदार्थ देऊ नयेत
घर किंवा इमारतीवर पाण्याची भांडी भरून ठेवावीत.
पाण्यात ग्लुकोज टाकल्यानं पक्ष्यांसाठी फायदेशीर ठरेल.
पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत
उन्हाळ्यात पक्ष्यांची घरटी तोडू नका
कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवावीत
पक्ष्यांना खाऊ म्हणून दाणे ठेवावेत, तेलकट पदार्थ टाळावेत
पाळीव प्राण्यांना उन्हात फिरायला नेऊ नका