Nagpur Central Jail Mumbai Train Blasts Convict Release
नागपूर : मुंबई रेल्वे मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असलेल्या १२ जणांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश सुटका केली. यापैकी तीन जण नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. दोघांची सोमवारी (दि.२१) रात्री सुटका झाली. बाहेर जमलेली गर्दी लक्षात घेता आम्हाला येथून सुरक्षित बाहेर काढा, हमे महफूज निकालो....अशी विनंती वारंवार या आरोपींनी पोलिसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अखेर पोलिसांनी चकवा देत त्यांना कुटुंबीयांसमवेत आधी अजनी चौकात सोडले व नंतर विमानतळाकडे रवाना केले. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी कारागृह प्रशासन, पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर होती. एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दिकी व नावेद हुसेन खान रशीद हुसेन खान या दोघांना फाशीची तर शेख मोहम्मद अली अलाम शेख याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सिद्दिकी व मोहम्मद अली या दोघांची सोमवारी कारागृहातून सुटका झाली.
शिक्षा झाल्यानंतर चार जणांना नागपुरातील मध्यवर्ती कारागृह येथे ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे मध्यंतरी कमाल अन्सारी यांचा मृत्यू झाला. दोघांना कारागृहातील हाय सिक्युरिटी झोनमध्ये ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी तिघे निर्दोष असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतर तिघांना कारागृहातील अत्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. कारागृह प्रशासनाला अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला. याशिवाय बाहेर आल्यावरही कुठली अनुचित घटना घडू नये या दृष्टीने पोलीस दहशतवादी पथक, गुप्तचर यंत्रणा सक्रीय होती.
बाहेर धंतोली पोलिसांचे पथकही तैनात होते. माध्यमांची गर्दी होती. सुमारे पाचच्या सुमारास न्यायालयाचा आदेश कारागृह प्रशासनाकडे पोहोचताच दोघांच्या सुटकेच्या हालचाली सुरू झाल्या. कारागृहासमोर मोठी गर्दी जमली. अखेर मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलिसांची तीन वाहने ठेवण्यात आली. याच वाहनापैकी एका वाहनाने दोघांना सोडण्यात येणार असल्याचा समज बाहेर झाला.
परंतु, रात्री पावणेआठच्या सुमारास या दोघांना नातेवाईकांसह दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. अजनी चौकातून ते दोघे पुढे कुठे गेले याबाबत गुप्तता बाळगण्यात येत असली तरी ऑटोने विमानतळावर आणि तिथून पुढे रात्रीच्या विमानाने मुंबईला गेल्याची माहिती पुढे आली.