मुंबई : मुंबईतील वाहतुक कोंडीच्या प्रश्नावर कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जाणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुंबईतील वाहतूक व्यवस्थापनाचा विशेष आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत आमदार मुरजी पटेल यांनी शनिवारी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तर, आमदार अस्लम शेख यांनी मुंबईतील अनेक रस्त्यांवर उलट दिशेने गाड्या चालवल्या जात असल्यामुळे अपघातात वाढ आणि वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार केली. आमदार वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील बिकेसी,
कला नगर, कुर्ला ते सांताक्रुझ जोड मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग या परिसरात होत असलेल्या वाहतुक कोंडीकडे सभागृहाचे लक्ष वेधले तर आमदार दिलीप लांडे यांनी चांदिवली परिसरातील वाहतुक कोंडीचा मुद्दा मांडला. यावर, आशिष शेलार म्हणाले की, याबाबत नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईचा वाहतूक नियोजन आराखडा मुंख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात येतो आहे. तसेच मुंबईतील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या भंगार गाडयांचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असून मुंबई महापालिका याबाबत कार्यवाही करीत आहे. मुंबईतील आमदारांनी ज्या सूचना केल्या आहेत त्याचा विचार करुन याबबात लवकरच बैठकही घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.