Pudhari Photo
मुंबई

Mumbai Rains : गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, "गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे" असे आवाहन केले आहे. Mumbai Rain Update

काय म्हणाले मुख्यमंत्री?

  • मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

  • वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू.

  • गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे.

  • मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे.

आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभुमीवर आपल्या एक्स खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे,

"मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मी करत आहे." Mubai Rain Update

मुंबईत जोरदार पाऊस

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबईत (Mumbai rains) आज मध्यरात्री १ ते सकाळी ७ वाजेदरम्यानच्या ६ तासांत सुमारे ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १. ५७ वाजता समुद्रात ४. ४० मीटर उंच भरती आहे.

रेल्वे गाड्यांना विलंब, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात येत आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे माटुंगा रोड ते दादर दरम्यान रुळावर पाणी साचल्याने उपनगरीय गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे रुळांवरील पाणी काढण्यासाठी उच्च क्षमतेच्या जलपंपांचा वापर केला जात असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT