Mumbai Rain Update Weather Alert IMD:
मुंबई : सोमवारी पहाटेपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर भागांना मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपले. दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगरात झालेल्या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली. तर दुसरीकडे हवाई सेवा आणि रस्ते वाहतुकीलाही फटका बसल्याने मुंबईकरांची पहिल्याच पावसात दैना उडाली आहे.
हार्बर मार्गावर मस्जिद बंदर आणि करी रोड रेल्वे परिसरात ट्रॅकवर पाणी साचल्याने CSMT कडे जाणारी लोकल सेवा थांबवण्यात आली आहे.
हवाई सेवेला फटका
मुंबई विमानतळावरून टेक ऑफ आणि लँडिंग करणाऱ्या विमानांनाही वाहतुकीचा फटका बसला आहे. इंडिगो आणि एअर इंडियाने प्रवाशांसाठी Advisory जारी केली आहे. यात म्हटले आहे की, पावसामुळे मुंबई विमानतळावरील हवाई सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिस्थितीनुसार विमान विलंबाने किंवा विमानाचे मार्ग बदलले जाण्याची शक्यता आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन विमान कंपन्यांनी केले आहे.
आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबई, मीरा-भाईंदर, वसई विरार, पालघर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल या भागांमधील नागरिकांना मनस्तापाचा सामना करावा लागला. पावसाचा वेग इतका होता की छत्री असूनही अनेक जण भिजून गेले. मोठ्या सरींमुळे दक्षिण मुंबईच्या काही सकल भागात पाणी तुंबले होते. परंतु या पाण्याचा पालिकेने तातडीने निचरा केला. सकाळी 10 नंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाली.
पावसामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने सुरू आहे. तर मुंबईकडे येणाऱ्या महामार्गांवरही वाहनांच्या रांगा लागल्या आहे. तर मुंबई विमानतळावरील विमानांचे आगमन आणि प्रस्थानही उशिराने सुरू असल्याचे समजते. स्पाईस जेटने प्रवाशांना विमान सेवेत विलंब होण्याची शक्यता आहे, अशा आशयाचे मेसेज प्रवाशांना पाठवले आहेत.
मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा विस्कळीत
मध्य तसेच हार्बर रेल्वेच्या काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याने सोमवारी मुंबईच्या बहुतांश भागात तसेच उपनगरात डब्यांची सेवा पोच करू शकत नाही याबद्दल संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
दुपारी - ११.२४ वाजता
रात्री ११.०९ वाजता
समुद्रात ४.७५ व ४.१७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार
मुंबईच्या मेट्रो सेवेला फटका
मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डॉ. अॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश/निकास मार्गावर पाणी शिरले. ही घटना सांडपाणीनिःसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर-रिटेनिंग वॉल कोसळल्याने घडलेली आहे. ही भिंत प्रवेश/निकास संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आली होती.
यासंदर्भात एमएमआरसी म्हटले आहे की, पाणी शिरलेला प्रवेश/निर्गम मार्ग सध्या बांधकामाधीन असून प्रवाशांसाठी खुला झालेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र -आरे जेव्हिएलआर ते वरळी दरम्यान मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे.
आपत्ती व्यवस्थापन, अभियांत्रिकी व सुरक्षा पथकाने घटनास्थळी तात्काळ कार्यवाही सुरू केली असून, बाधित भागाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची असून, सर्व प्रणाली पूर्णपणे कार्यक्षम झाल्यानंतरच सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल.