Mumbai Rain Pudhari
मुंबई

Mumbai Rain: मुंबईत उकाड्यानंतर दिलासा; 31 मार्चपासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता

तापमान 31 अंशांपर्यंत घसरणार, राज्यातील काही भागात यलो अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) 31 मार्चपासून शहर आणि उपनगरांमध्ये हलका आणि तुरळक तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अनुभवलेल्या सर्वात उष्ण दिवसांच्या तुलनेत महिनाअखेर तापमानात घट झाली. शनिवारी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस होते. रविवारी त्यात एकाने घट झाली. सोमवारी ते आणखी खाली येण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये 2 एप्रिलपर्यंत कमाल तापमान सरासरी 31 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

या महिन्यात मुंबईने उष्णतेच्या किमान चार वेगवेगळ्या लाटा अनुभवल्या. सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 10 मार्चला पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला. अलीकडील मार्च महिन्यातील हे विक्रमी तापमान ठरले.

भारतीय हवामान विभागाने मुंबई, पालघर आणि ठाणे यांसारख्या कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी अद्याप कोणताही अधिकृत हवामान इशारा जारी करण्यात

आलेला नसला तरी महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये, विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 1 एप्रिलपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा (यलो अलर्ट) इशारा दिला आहे.

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, अरबी समुद्रातून येणारा आर्द्रतेचा प्रवाह आणि परस्परसंबंधित हवामान प्रणाली यांसारख्या वातावरणीय प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे हा बदल होत आहे. हे बदल उन्हाळ्यापूर्वीच्या कोरड्या हवामानाच्या शिखराकडून अधिक अस्थिर मान्सूनपूर्व टप्प्याकडे होणारे संक्रमण दर्शवतात.

मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला येणारा मान्सूनपूर्व पाऊस तीव्र उष्णतेनंतर थोडासा दिलासा असला वादळी वारे आणि अचानक सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे काही ठिकाणी नुकसानीचा धोका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT