

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वात दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील, तर अजूनही वेळ गेलेली नाही, असे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाचा सूर लावल्याने पुन्हा एकदा विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत आता कोणतीही चर्चा नसून निर्णय घ्यायचे सर्वाधिकार पक्षाच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना असल्याचे स्पष्ट केले.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, सुनेत्रावहिनींचे नेतृत्व त्यांना मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून पुढे जात असतील तर आम्हालादेखील त्याचा अभिमान असेल. आमचा पक्ष मोठा होत असेल तर ते सकारात्मकपणे पाहायला हवे, असेही सुनील शेळके म्हणाले. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही याबाबत पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले की, सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, तर महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला मनापासून आनंद होईल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते आणि आमदारांची अशीच इच्छा आहे की, सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकजुटीने काम करावे.
आपल्या पक्षातील आमदाराच्या या भूमिकेवर सुनील तटकरे यांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, विलीनीकरणाबाबत आमचे म्हणणे असण्याचे कारण नाही, यासंदर्भातील निर्णय सुनेत्रावहिनीच घेतील. या क्षणाला माझ्याकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. पण आमदार सुनील शेळके यांनी कोणत्या संदर्भात हे वक्तव्य केले आहे, हे मला माहिती नाही. त्यामुळे मला या विषयावर मत व्यक्त करायचे नाही.