मुंबई: रेल्वेने नुकताच एक नवा प्रकल्प हाती घेतला असून यामुळे भारतातील प्रवासाची पद्धतच कायमची बदलणार आहे. कमीत कमी खर्चात वेगवान प्रवास तेही ट्रेनने शक्य होणार आहे. देशात 7 प्रमुख हाय-स्पीड रेल कॉरिडोर बांधण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे. यासाठी अंदाज 16 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या नवीन प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे रेल्वे प्रवास अवघा ४८ मिनिटाचा होणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोलकातामध्ये या प्रकल्पांचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुरी या मार्गाची पाहणी केली. दिल्ली ते सिलिगुरी दरम्यानचा प्रवासाचा वेळ फक्त सहा तासांवर येणार आहे.
यावेळी त्यांनी असंही नमूद केलं की मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरसह हे नवीन रेल्वे प्रकल्प दक्षिण, उत्तर आणि पूर्व भारतामध्ये हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या हाय-स्पीड रेल्वेंमुळे अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
कसे असतील मार्ग?
पहिली हाय-स्पीड रेल्वे दिल्ली ते वाराणसीपर्यंत धावणार असून हा मार्ग 945 किलोमीटर लांब असेल. प्रवास केवळ 3.5 तासांमध्ये होणार आहे. दुसरी ट्रेन वाराणसी ते सिलिगुरी असून या 670 किमी लांब ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ 2.4 तासांवर येणार आहे. त्यानंतर मुंबई ते पुणे हाय-स्पीड रेल्वे मार्ग 170 किमी लांब असेल व प्रवास अवघ्या 48 मिनिटांमध्ये होणार आहे.
सध्या मुंबई ते पुणेदरम्यान सर्वात वेगवान रेल्वे म्हणजे डेक्कन क्वीन. या ट्रेननेही प्रवासात 3.3 तास जातात. चौथा 501 किमी लांब मार्ग पुणे ते हैदराबाद असेल व प्रवास अवघ्या 1.6 तासांत शक्य होणार आहे.
पहिली बुलेट ट्रेन कधी?
सध्या भारतात पहिली पूर्णपणे स्वदेशी बनावटीची बुलेट ट्रेन तयार केली जात आहे. ताशी 280 किमी वेगाने ही ट्रेन धावणार असून बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्यात 100 किलोमीटर मार्गावर धावणार आहे.
ऑगस्ट 2027मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवरील सुरत ते बिलिमोरा या मार्गाचं उद्घाटन करून ट्रेनसेवा सुरू केलं आहे. या ट्रेनचा वेग नंतर ताशी 350 किमीही करण्याची योजना आहे. सध्या मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या बांधकामाचा वेग 15 किलोमीटर दरमहा पर्यंत पोहोचला आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं आहे.