मुंबई: महानगरपालिकेकडून आता गृहनिर्माण संस्थांनी ओल्या कचऱ्याची जागेवर प्रक्रिया केल्यास मालमत्ता करात १५ टक्के सवलत मिळणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातील उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘विकेंद्रित कचरा प्रक्रिया अभियान’ सुरू केले आहे. या उपक्रमाचा उद्देश कचऱ्याची वाहतूक कमी करणे, पुनर्वापराला चालना देणे आणि ‘सर्क्युलर इकॉनॉमी’ला बळकटी देणे हा आहे.
मुंबई शहरात मोठ्या गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संकुले आणि इतर आस्थापने आहे. या सर्वांनी आपल्या आवारातच ओल्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे तसेच सुका कचरा अधिकृत पुनर्प्रक्रिया संस्थांकडे देणे अपेक्षित आहे.
या उपक्रमात ज्या गृहनिर्माण संस्था ओल्या कचऱ्यावर जागेवर प्रक्रिया करतील व महानगरपालिकेच्या निकषांचे पालन करतील, त्यांना १५% पर्यंत मालमत्ता करात सवलत देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सर्व सहाय्यक आयुक्त व घनकचरा व्यवस्थापन विभागाला मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांची ओळख करून त्यांना जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सक्रिय सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
या उपक्रमामुळे मुंबई शहरात कचऱ्याची वाहतुकीत नाही,तर तो जिथे निर्माण होतो तिथेच शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. सर्व गृहनिर्माण संस्था, व्यापारी आस्थापना, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि इतर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणारे यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले.
मुंबईची सद्यस्थिती
३,१७७ जागांची मोठ्या प्रमाणात कचरा करण्याची नोंद
२,०२५ संस्थांची MyWaste पोर्टलवर नोंदणी
५१३ संस्थांकडे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध