मुंबई: मुंबईतील मोकळ्या जागा, खेळाची मैदाने, उद्यानांचे काँक्रीटीकरण होता कामा नये. गेल्या चार वर्षांत मुंबईतील मैदाने आणि झाडे कमी होत आहेत. मुंबईचा चेहरामोहरा बदलला जात आहे.
गेल्या चार वर्षांत इथल्या १७ हून अधिक मैदानांची आरक्षणे बदलण्यात आली. या मैदानाच्या जागा निवासी आणि व्यावसायिक करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी केला.
मुंबईची मोकळी मैदान, मुंबईतील रिक्रीएशन ग्राऊंड्स, प्ले ग्राऊंड ही मैदानेच राहिली पाहिजेत आणि त्यावर काँक्रीट टाकू नये हे ठरवण्यासाठी आपण जमलो आहोत. जर आपण एकत्र नाही आलो, तर हे लोक मुंबई गिळून टाकतील.
गेल्या चार वर्षांत शहरातील १७ हून अधिक मैदानांची आरक्षणे बदलण्यात आली असून ही १७ मैदानांची आरक्षणे निवासी आणि व्यावसायिक आरक्षणे करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला. त्याचवेळी मुंबईतील मैदाने वाचविण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून तिरंगा हाती घेत एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा मैदानाचे आरक्षण बदलू नये, या मागणीसाठी आयोजित तिरंगा रॅलीत ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे गटाचे आमदार, नगरसेवकांसह फुटबॉलप्रेमी उपस्थित होते. यावेळी फुटबाॅलच्या भाषेतील 'रेड कार्ड' दाखवत सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
वांद्रे येथील या फुटबॉल मैदानाची मूळ जागा २.५८ हेक्टर म्हणजेच साधारण ६ एकर इतकी ही जागा आहे. ही मैदाने आणि आजूबाजूचे सगळे भाजप आमदारांच्या घशात घालत आहात. मुलुंडमध्येही हेच सुरू आहे.
अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स स्वच्छ करून त्याठिकाणी मैदान केले. मात्र सरकारने ही जागा दरवर्षी २१ लाख रुपयांच्या बदल्यात एका संस्थेला दिली आहे. त्याशिवाय म्हाडाचे तीन प्लॉट भाजपच्या एका आमदाराच्या संस्थेला फुकट दिले. आम्ही आमच्या मैदानासाठी पैसे का मोजावेत, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला.
वांद्रे येथील ही जागा भाजपने सुरक्षित केली : भाजप
वांद्रे येथील फुटबाॅलच्या मैदानासाठी रॅली काढणाऱ्या आदित्य ठाकरे यांनाच जनतेने रेड कार्ड दाखविले आहे. वांद्रे येथील हे मैदान अतिक्रमणमुक्त करत ती सुरक्षित ठेवण्याचे काम गेल्या १५ वर्षांत भाजपने केले आहे.
या ठिकाणी मैदान असावे की एक्झिबिशन सेंटर याचा वाद न्यायालयात आहे. न्यायालय यावर निर्णय करेल. मात्र आज मैदानासाठी रॅली काढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी अनेक भूखंड गिळंकृत केले आहेत त्याचा आधी हिशेब द्यावा. मुंबईतील एकही मोकळी जागा, भूखंड या लोकांनी शिल्लक ठेवला नाही. मात्र, आता न्यायालयात असलेल्या एका विषयात रॅली काढून नौटंकी केली जात आहे. असा आरोप भाजपने केला आहे.