मुंबई: वापरास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने कारवाई करून गेल्या आठ वर्षात 1 लाख 19 हजार किलो प्लास्टिक जप्त केले. फेरीवाले व दुकानदारांकडे उघडपणे ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कारवाई करून महापालिकेच्या तिजोरीत भर पडली असली तरी प्लास्टिक मुक्त मुंबईचा मूळ हेतू साध्य झालेला नाही.
23 जून 2018 ते 31 मार्च 3026 पर्यंत या आठ वर्षात 29 लाख 12 हजार 156 दुकाने व फेरीवाल्यांची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये 18 हजार 408 दुकानदारांकडून 1 लाख 19 हजार 437 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. केवळ प्लास्टिक जप्त करण्यात आले नाही तर, 9 कोटी 21 लाख 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
पालिकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झालेला नाही. अशा पिशव्या वापरणाऱ्यांवर पालिकेकडून दररोज कारवाई सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या कारवाईसाठी विभाग स्तरावर 24 पथकाचीही निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांमार्फत अचानक दुकानांना भेटी देऊन, त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात येत असल्याचे पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाकडून सांगण्यात आले.
पथकांमध्ये यांचा समावेश
दुकाने व आस्थापना खात्यातील सुविधाकार
अनुज्ञापन खात्यातील निरीक्षक
सार्वजनिक आरोग्य खात्यातील स्वच्छता निरीक्षक
घनकचरा खात्यातील कनिष्ठ पर्यवेक्षक
सुरक्षा खात्यातील सुरक्षा रक्षक
दंडाची रक्कम
प्रथम गुन्ह्यासाठी- 5 हजार
दुसऱ्या गुन्ह्यासाठी- 10 हजार
तिसऱ्या गुन्ह्यासाठी - 25 हजार व 3 महिने कारावास