मुंबई: वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, असा महिमा राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांनी सांगितला आहे. परंतु वृक्ष-वेलींना महत्व न देता सर्रास झाडांचा बळी दिला जात आहे.
विकासकामाच्या नावाखाली चेंबूर, घाटकोपर, भांडुप व चांदिवली येथील ५९ झाडांचा बळी जाणार आहे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्यात आल्या असून सात दिवसात या हरकती व सूचनांना नोंदवल्यास झाडे कापण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
विकास कामांच्या नावाखाली दरवर्षी हजारो झाडांचा बळी घेतला जातो. यात काही झाडे प्रत्यक्ष कापली जातात तर काही झाडांचा पुनर्रोपनाच्या नावाखाली बळी दिला जात आहे. आतापर्यंत पुनर्रोपणाच्या नावाखाली हटवण्यात आलेली झाडे जगली की नाही, याबाबतची कोणतीही आकडेवारी पालिकेकडे नाही.
दरम्यान आता चेंबूर घाटकोपर भांडुप चांदिवली येथे विकासाच्या नावाखाली ६० झाडे हटवली जाणार आहेत. यात २८ झाडे पूर्णपणे कापली जाणारा आहेत. ही झाडे १५ ते २० वर्ष जुनी आहेत. दरम्यान पुनर्रोपणाखाली ३१ झाडे हटवण्यात येणार आहेत.
ही झाडे कापण्या संदर्भात नागरिक आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी मुंबई महानगरपालिकेने हरकती व सूचना मागवल्या आहेत. आपले आक्षेप ७ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात विहित नमुन्यात उद्यान अधिक्षक व वृक्ष अधिकारी यांच्या कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. आपले आक्षेप dysg.ta@mcgm.gov.in या ई-मेलवरही नोंदवू शकतात. यावर ३१ जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही झाडे वाचवण्यासाठी आता नागरिकांकडे पुरेशी संधी आहे.
चांदीवली
कापण्यात येणारे झाड - १
पुनर्रोपित झाडे - १५
चेंबूर
कापण्यात येणारे झाड - ५
पुनर्रोपित झाडे - ०
घाटकोपर
कापण्यात येणारे झाड - २०
पुनर्रोपित झाडे - ४
भांडुप
कापण्यात येणारे झाड - २
पुनर्रोपित झाडे - १२