मुंबई: नीट आणि अन्य केंद्रीय परीक्षांच्या पेपर फुटीच्या विरोधात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमी परिसरात उतरलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अटकाव केला.
आंदोलकांना व्हॅनमध्ये कोंबून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान आझाद मैदान परिसरात वांगचुक यांच्या समर्थनार्थ एकत्र आलेल्या तरुणांनाही पोलिसांनी तेथून हटवले.
दरम्यान, आंदोलनाची शक्यता गृहीत धरून मुंबई पोलिसांनी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा, सरकारी कार्यक्रम आणि कायदेशीर परवानगी घेतलेल्या उपक्रमांना या आदेशातून सूट असेल.
चैत्यभूमीच्या अशोक स्तंभासमोर सोमवारी चार वाजता धरणे आंदोलन होणार होते. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली.
सकाळपासून आयोजन घटनास्थळी पोहोचू नयेत यासाठी सहापेक्षा अधिक व्यक्तींना स्थानिक पोलिसांच्या मदतीने घरी स्थानबध्द करण्यात आले. तरीही सोशल मीडियावरील आंदोलनाची माहिती वाचून अनेक जण चैत्यभूमी परिसरात पोहोचले. त्यांना पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन करण्यापासून रोखण्यात आले.
चैत्यभूमीवरील आंदोलनाच्या आयोजकांमधील काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनाही घरीच स्थानबध्द ठेवले होते. 'दिल्लीत आंदोलन सुरू असताना गल्लीत घाबरणारे हे हुकूमशाही सरकार, पोलिसांच्या मदतीने आवाज दडपून टाकत आहे.
पण या सरकारच्या दडपशाहीला जनता भीक घालत नाही. माझ्यासहीत अनेक आंदोलकर्त्यांना आज मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांनी घरात बंदिस्त (नजरकैद) केले होते. जनतेच्या प्रश्नाला उत्तर देण्याची या सरकारमध्ये हिंमत नाही. हे सरकार फक्त अदानी व अंबानीसाठी काम करते, असा आरोप सुरेशचंद्र राजहंस यांनी केला
भाकपचे सचिव कॉ. मिलिंद रानडे यांना टिळक नगर पोलिसांनी घरीच स्थानबध्द केले. चैत्यभूमी येथे निदर्शने करण्यासाठी मी जाणार होतो, मात्र मला पोलिसांनी घराबाहेर पडण्यास मनाई केली. मी बाहेर पडू नये यासाठी माझ्या घराबाहेर दोन पोलीस कर्मचारी तैनात केले, असा आरोप रानडे यांनी केला.
मुंबईतील आंदोलनाशी संबंध नाही
मुंबईत सोमवारी कॉक्रोच जनता पार्टी मुंबई कोअर कमिटीकडून कोणत्याही प्रकारचे आंदोलन झाले नसल्याचे स्पष्टीकरण कॉक्रोच जनता पार्टी कोअर कमिटीप्रमुख प्रणय अहिरे यांनी दिले. दरम्यान,आझाद मैदान पोलीस ठाण्याजवळ एका मुलीने सोशल मीडियावरुन उद्या मंगळवारी (दि.२१) याप्रश्नी आझाद मैदानात दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत शांततेत आंदोलन होणार आहे, या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
तीन पोलीस ठाण्यांत पाच गुन्हे दाखल
मुंबई पोलिसांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आझाद मैदान, मरीन ड्राइव्ह आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्यांत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये विविध व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याने १८ जुलै २०२६ रोजी आझाद मैदान आणि मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर १९ जुलै २०२६ रोजी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आणखी तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.