मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) प्रवासी संख्येचा एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्येने २ लाखांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या आहे. पावसाळ्यातही न थांबता धावणाऱ्या मेट्रोमार्ग २अ आणि मेट्रो मार्ग ७ वर मंगळवारी (दि.२७) २ लाख, ३ हजार, ५८१ मुंबईकरांनी प्रवास केला.
मेट्रोमार्ग २अ आणि मेट्रो मार्ग ७ कार्यरत झाल्यापासून नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोची (Mumbai Metro) सर्वाधिक दैनंदिन संख्याही नवा उच्चांक गाठत आहे. मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा सुरु झाल्यानंतर म्हणजेच २ एप्रिल २०२२ ते २७ जून २०२३ पर्यंत मेट्रो प्रवासी संख्या ३,३३,८१,९२० इतकी आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करताच मुंबई मेट्रोचे पहिले जाळे या शहराला मिळाले. त्यानंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. २० जानेवारी ते २७ जून २०२३ या ५ महिन्यांच्या कालावधीत २,४४,१६,७७५ प्रवाशांनी मुंबई मेट्रोने प्रवास केला.
मुंबईकरांना अतिवृष्टीमुळे त्रास होणार नाही. याची काळजीही मुंबई मेट्रोने घेतली आहे. मुंबई मेट्रो मुसळधार पावसातही विना व्यत्यय आपली सेवा सुरु राहिल, याची सर्वतोपरी काळजी आधीच घेण्यात आली आहे. नागरिकांसाठी मुंबई मेट्रोने मान्सून कंट्रोलरूम देखील सुरु केला आहे. प्रत्येक मेट्रो स्थानकावर ६४ कॅमेरा प्रत्येक घटनेची नोंद घेत आहे.
विना व्यत्यय किंवा सीमलेस प्रवासासाठी सुरु करण्यात आलेल्या मुंबई-१ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधेला देखील नागरिकांनी पसंती दिली आहे. आतापर्यंत जवळपास १,१४,१७१ प्रवाशांनी मुंबई वन कार्डाचा लाभ घेतला आहे.
पावसाळ्यातही मुंबई मेट्रो सेवा अशीच अविरत सुरु राहील. याकडे सातत्याने आमचे लक्ष आहे. जर अतिवृष्टीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. तर अतिरिक्त मेट्रो चालवण्याची तयीरीही मुंबई मेट्रोने ठेवली आहे, असे महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच महानगर आयुक्त, एमएमआरडीए डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
हेही वाचा