मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाची कामे अद्यापही अपुरी असल्यामुळे गणेशोत्सवासाठी कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार्या वाहनांना टोलमाफी देण्याचा विचार सरकारचा आहे. याबाबतची घोषणा १० सप्टेंबरपूर्वी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणवासीयांना विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या वाहन चालकांना हा रस्ता सोयीचा व जलद ठरणार आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणात जाण्यासाठी जवळचा मार्ग असला तरी, या मार्गाचे काम अद्यापही सुरू आहे.
लांजा व संगमेश्वर हे दोन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-पुणे कोल्हापूरमार्गे कोकणात जाण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी वाहनांवर आकारला जाणारा टोल पूर्णपणे फ्री करण्यात येणार आहे.
रायगडमधील १०० टक्के गावांना तर रत्नागिरी जिल्ह्यातील ६० ते ७० टक्के गावांना मुंबई-गोवा महामार्ग शिवाय दुसरा पर्याय नाही.
मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांना व्हाया कोल्हापूर, कराड सातारा मार्गे जाणे सोयीचे आहे. त्यामुळे मुंबई कोल्हापूर बंगळूर महामार्गाचा किमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांनी वापर केल्यास मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक कोंडी टाळणे शक्य असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
१८६० रुपयांची बचत
मुंबई-बंगळूर हायवेने प्रवास करायचा झाल्यास कोल्हापूरपर्यंत सिंगल प्रवासाला सरासरी ९३० रुपये इतका टोल लागतो. दुहेरी प्रवासासाठी १,८६० रुपये इतका खर्च येतो. परंतु हा मार्ग टोल फ्री करण्यात येणार असल्यामुळे केवळ पैशाचीच बचत होणार नाही तर प्रवासही जलद होणार आहे.
येथे मिळणार फ्री पास
मुंबई शहरासह ठाणे, पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आरटीओसह स्थानिक पोलिस ठाण्यात पास उपलब्ध होणार आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यातून जाणाऱ्या चाकरमान्यांना त्या त्या विभागातील आरटीओ व पोलिस ठाण्यामधून पास मिळणार आहेत. पास घेणे अनिवार्य असून तो नसल्यास टोल फ्री होणार नाही.