मुंबई ; पुढारी वृत्तसेवा गेले नऊ दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला जोगेशवरी विक्रोळी उड्डाणपूल आज (रविवार) पहाटे पासून वाहतुकीसाठी खुला झाला. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे वाहनधारकांना पूर्वद्रुतगती मार्गावरून ठाण्याच्या दिशेने प्रवासाचा आनंद घेता आला.
पुलाचे सांधे बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याने १३ मेपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. परिणामी ठाणे आणि पुलाच्या खालून डावे वळण घेऊन पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. या दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांना एकच मार्ग शिल्लक राहिल्याने पूर्व द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. घाटकोपर ते विक्रोळी हे अंतर कापण्यास एक तास खर्ची पडत होता.
पुलाच्या दुरुस्तीचे काम २४ मे रोजी पूर्ण होणार होते. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याआधीच काम पूर्ण केले. त्यामुळे रविवारी पहाटेपासून पूर्व द्रुतगती मार्ग वाहतूक कोंडीमुक्त झाला.