मुंबई : मुंबईतील उद्याने मोकळ्या जागांवरील गर्दुल्ल्यांचा उच्छाद रोखण्यासाठी पोलिस प्रशासन आणि महापालिकेच्या माध्यमातून संयुक्त अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी विधानसभेत दिली.
मुंबईतील महापालिकेच्या उद्यानात गर्दुल्ले आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचा वावर वाढल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे दिलीप लांडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला नगरविकास खात्याचे प्रभारी मंत्री म्हणून देसाई यांनी उत्तर दिले.
मुंबईतील उद्यानांमध्ये स्वच्छता आणि परिरक्षण करण्यासाठी महापालिकेमार्फत कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंत्राटामध्ये उद्यानाची दैनंदिन साफसफाई, कचरा उचलणे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकाचे काम तथा जबाबदारी पार पाडण्यासाठी राखणदार नियुक्त करणे यांचा समावेश आहे.
यामध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असल्यास मेस्कोच्या माध्यमातून अधिक सुरक्षा रक्षक नेमण्यासंदर्भात महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील, अशी माहिती देसाई यांनी दिली.
या उद्यानांमध्ये गर्दुल्यांचा वावर रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस यांची संयुक्त मोहीम राबविली जाईल. त्यांच्यामार्फत उद्यानांमध्ये अचानक भेट आयोजित केली जाईल. चांदिवली, मानखुर्द या विभागांसह संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिवेशनानंतर बैठक घेऊन यासंदर्भात ठोस कारवाई करण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले.
वांद्रे पूर्व येथील भारतनगर परिसराचा पुनर्विकास करण्याबाबत सरकारची कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी या परिसरात सर्वेक्षण आवश्यक आहे. त्यातून अतिक्रमित, झोपडीधारक आणि मूळ म्हाडा ले-आऊटमधील रहिवासी यांची विगतवारी होईल. त्यानंतर या परिसराचा कोणत्या यंत्रणेमार्फत विकास करायचा याचा निर्णय केला जाईल, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी अन्य एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी ही लक्षवेधी मांडली. यावर, भारतनगर येथील मूळ
जागा म्हाडाच्या ताब्यात असून येथील क्षेत्र 40 एकरपेक्षा अधिक आहे. या ठिकाणी म्हाडामार्फत रहिवाशांना वितरीत केलेल्या जागेबरोबरच काही अतिक्रमणधारक तसेच काही झोपडीधारक आहेत. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन विगतवारी होणे गरजेचे आहे. या सर्वांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्या परिसराच्या विकासाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.