प्रकाश साबळे
मुंबई: मुंबईतील नालेसफाई दरवर्षी काही ना काही कारणाने चर्चेत राहते. यावर्षी या कामांना उशीर सुरुवात झाल्याने अक्षरश: लगीनघाई सुरू आहे. कंत्राटदाराकडून हातसफाई सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. पोईसर नदी सफाईतही असाच प्रकार समोर आला आहे. फक्त 6 तासांत तब्बल 17 डंपर (प्रत्येक डंपरमध्ये 18 टन गाळ) म्हणजे अंदाजे 300 टनांपेक्षा जास्त गाळ उपसण्यात आल्याचा दावा कंत्राटदारांकडून करण्यात आला आहे. याची चौकशी करण्याची मागणी कांदिवलीकरांकडून करण्यात आली आहे.
मुंबईतील मिठी, पोयसर, दहिसर आणि ओशिवरा नद्यांसह नाल्यांची महापालिकेकडून मान्सूनपूर्व सफाई सुरू आहे. पावसाळा तोंडावर आला असताना अनेक ठिकाणी सफाईची कामे सुरूच झालेली नाहीत तर काही ठिकाणी सफाई न करता सफाईचा दावा केला जात आहे.
पोयसर नदीचा उगम हा बोरिवलीतील नॅशनल पार्कच्या बाजूच्या टोकाला आहे. कांदिवली उपनगरातून ती वहात पुढे दामूनगर, हनुमान नगर, बिहारी टेकडी मार्ग वर्सोवा खाडीला मिळते. यामुळे तिची सफाई व्यवस्थित न झाल्यास हनुमाननगर, बिहारी टेकडी, दामूनगर येथील झोपडपट्टीतील नागरीवस्ती जलमय होते.
मात्र या नदी सफाईचा एक अजब प्रकार समोर आला आहे. फक्त 6 तासांत तब्बल 17 डंपर (प्रत्येक डंपरमध्ये 18 टन गाळ) म्हणजे अंदाजे 300 टनांपेक्षा जास्त गाळ उपसण्यात आल्याचा दावा कंत्राटदारांकडून करण्यात आला आहे.
एका डंपरला नाल्याजवळ येणे, गाळ भरणे आणि पुन्हा बाहेर जाण यासाठी किमान अर्धातासपेक्षा जास्त वेळ लागतो. मग 6 ते 7 तासांत प्रत्येकी 18 टन गाळाने 17 डंपर भरले कसे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ता शिवराज कोंडे यांनी उपस्थित केला आहे.
जेसीबीपेक्षा ‘भ्रष्टाचाराची मशीन’ जास्त वेगाने चालते? असा आरोपही कोंडे यांनी केला आहे. सदर कामाची तपासणी करून वरिष्ठांना अहवाल दिला जाईल, असे एसडब्लूडीची दुय्यम अभियंता माधव कुलकर्णी यांनी सांगितले.
पालिकेच्या यंत्रणेवर संशय
सफाई करताना कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही, लॉग सीट, डंम्पिंग फोटो, व्हिडीओ चित्रण आदी यंत्रणा कार्यान्वित मुंबई पालिकेकडून केल्या आहेत. असे असताना कंत्राटदाराकडून ही हातसफाई कशी केली. याठिकाणी कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे, लॉग सीट आणि व्हिडीओ चित्रीकरण केले जात नव्हता असाहीआरोप आहे.
यंदाही पाणी तुंबणार
दरवर्षी पोयसर नदी पावसाळ्यात ओव्हर फ्लो वाहते. यामुळे तिचे पाणी नागरी वस्तीमध्ये शिरते आणि कांदिवली पुर्वकडील हनुमाननगर, वडारपाडा, दामूनगर, बिहारी टेकडी अशा सखल भागातील नागरिकांच्या घरात शिरते. जर अशी सफाई सुरू असेल तर यंदाही या भागात गंभीर समस्या निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.