मुंबई: मुंबई शहर व उपनगरांतील नालेसफाई अगोदरच उशिरा म्हणजे 2 एप्रिलपासून सुरू झाली. त्यात 15 दिवसांत 22 टक्केच नालेसफाई झाली आहे. त्यामुळे 31 मे पूर्वी नालेसफाई पूर्ण कशी होणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नालेसफाई मार्चपासून सुरू होते. तरीही गेल्यावर्षी नालेसफाई वेळेत पूर्ण झाली नाही. पावसाळ्यातही कामे सुरूच होती. त्यामुळे यावर्षी ही कामे लवकर हाती घेण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले होते.
मात्र कंत्राटदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने प्रत्यक्ष 2 एप्रिलपासून काम सुरू झाले. यावेळी सुमारे 8 लाख 37 हजार 294 मेट्रिक टन गाळ उपसण्याचे टार्गेट होते. आतापर्यंत 1 लाख 84 हजार 456 मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला आहे. यात शहरातील मोठ्या नाल्यातून 22 टक्के म्हणजे 75 हजार 927 मेट्रिक टन तर छोट्या नाल्यातून 96 हजार 321 मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला आहे.
छोट्या नाल्यातून 3 लाख 67 हजार मेट्रिक टन उपसण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. छोट्या नाल्यांमध्ये रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या नाल्यांसह झोपडपट्टी व गलिच्छ वस्तीतून जाणाऱ्या नाल्यांचा समावेश आहे. त्यामुळे या नाल्याच्या साफसफाईवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
मिठी नदीतून 1 लाख 32 हजार मेट्रिक टन गाळ उपसण्यात येणार आहे. मात्र हे काम कासवगतीने सुरू असून आतापर्यंत 9 टक्केच गाळ उपसण्यात आला आहे. नालेसफाईच्या कामाचे चित्रीकरण करण्यात येत असून फोटोही काढले जात आहेत. आतापर्यंत 57 हजार 997 फोटो काढण्यात आले असून 61 हजार 347 व्हिडिओ काढण्यात आले आहेत.
9,393 डंपरचा वापर
नाल्यातून काढलेला गाळ डंपिंग ग्राउंडपर्यंत वाहून नेण्यासाठी आतापर्यंत 9,393 डंपरचा वापर करण्यात आला आहे. सध्या दररोज सरासरी डंपरच्या 175 ते 180 फेऱ्या होत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.