Digital Arrest Cyber Fraud Pudhari
मुंबई

Mumbai Digital Arrest: मुंबईत ‘डिजिटल अटकेत’ ठेवून २.८४ कोटींची फसवणूक; ७७ वर्षीय दाम्पत्य सायबर जाळ्यात

दहशतवादी संबंधांची खोटी धमकी देत पोलीस-एटीएस अधिकारी असल्याचे भासवले; बनावट कागदपत्रे पाठवून कोट्यवधी उकळले

पुढारी वृत्तसेवा

मुलुंड : मुंबईतील कांजूरमार्ग येथून सायबर फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. येथे एका 77 वर्षीय निवृत्त अधिकारी व त्यांच्या पत्नीला दहशतवादी संबंधांची खोटी धमकी देणाऱ्या घोटाळेबाजांनी 2.84 कोटी रुपयांना फसवले आहे. आरोपींनी या दाम्पत्याला डिजिटल अटकेत ठेवले आणि मुंबई पोलीस, एटीएस व एनआयएचे अधिकारी असल्याचे भासवले. इतकेच नाही तर हा घोटाळा करण्यासाठी त्यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या नावाचाही गैरवापर केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर पोलीस (पूर्व विभाग) यांच्याकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार ही फसवणूक 16 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाली. पीडित व्यक्तीने सांगितले की, महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागातील निवृत्त वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक असलेल्या त्यांच्या पत्नीला, पोलीस निरीक्षक रणजित कुमार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. सदर व्यक्तीने असा आरोप केला की, त्यांचे आधार कार्ड एका दहशतवादी संघटनेशी संबंधित बँक खात्याशी जोडलेले आहे आणि लखनौ एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फसवणूक करणाऱ्यांनी पुढे असाही दावा केला की, 90 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एकाकडे त्यांच्या आधार कार्डचा तपशील सापडला आहे.

यानंतर ‌‘प्रेमकुमार गौतम‌’ आणि ‌‘अजय श्रीवास्तव‌’ अशी स्वतःची ओळख एटीएस अधिकारी म्हणून करून देत आरोपींनी त्या जोडप्याला धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक सदानंद दाते यांच्या बनावट सह्या असलेले संस्थेचे बनावट ‌‘गोपनीयता करार‌’ व्हॉट्सॲपद्वारे पाठवले. याव्यतिरिक्त, हा घोटाळा खरा वाटावा यासाठी आरबीआयच्या उपगव्हर्नर पूनम गुप्ता यांच्या नावावरील बनावट पत्रेही जोडप्यास पाठवण्यात आली.

फसवणूक करणाऱ्यांनी पीडितांना सिग्नल मेसेजिंग ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले आणि त्यांना घरातच बंदिस्त राहण्याची सूचना केली. अशाप्रकारे त्यांना ‌‘डिजिटल अटकेत‌’ ठेवण्यात आले. त्या जोडप्याला दर चार तासांनी ‌‘आम्ही राष्ट्रीय सुरक्षेसोबत सुरक्षित आहोत,‌’ असा संदेश पाठवण्याचा आदेश देण्यात आला. जर त्यांनी आपल्या मुलांना किंवा इतर कोणालाही या परिस्थितीबद्दल सांगितले, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्यांना देण्यात आली होती.

चौकशी व पडताळणीच्या नावाखाली, आरोपींनी पीडितांना त्यांच्या बँक खात्यांमधील सर्व रक्कम त्यांनी दिलेल्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. भीतीपोटी, त्या जोडप्याने आरटीजीएसद्वारे अनेक व्यवहारांमधून एकूण 2.84 कोटी रुपये हस्तांतरित केले.

बँक खात्यांचा आणि मोबाईल क्रमांकांचा शोध सुरू

पैसे मिळाल्यानंतर फसवणूक करणारे संपर्काबाहेर गेल्यावर हा घोटाळा उघडकीस आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडितांनी पेडर रोड येथील एनआयए कार्यालयात संपर्क साधला. तेथे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की हे सायबर फसवणुकीचे प्रकरण आहे. त्यानंतर, सायबर पोलीस हेल्पलाइन (1930) वर तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत मुंबई सायबर पोलिसांनी तपास सुरू केला असून या मोठ्या फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचा आणि मोबाईल क्रमांकांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT