मुंबई : मुंबई शहर, उपनगरांमध्ये ठिकठिकाणी गॅस सिलिंडरसाठी रांगा लागलेल्या असून, बुकिंग ते डिलिव्हरी कालावधी वाढवण्यात आल्याने मुंबईकरांना या रांगेतून तूर्त कोणताही दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. या टंचाईचा मोठा फटका आता मुंबईकरांच्या सकाळच्या नाश्त्याला बसेल. ज्याशिवाय मुंबईकरांची सकाळ सुरू होत नाही त्या ब्रेड-पावचाच पुरवठा धोक्यात आला असून, मुंबईचा 70% पुरवठा खंडित होण्याची भीती आहे.
इंडिया बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष खोदादा इराणी यांनी सांगितले की, मुंबईतील बहुतांश बेकऱ्या एलपीजी सिलिंडरवरच चालतात. 350 मोठ्या बेकऱ्यांपैकी 80 टक्के बेकऱ्या व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरतात. 20% बेकऱ्यांकडे व्यावसायिक पीएनजी म्हणजे पाईप गॅस आहे. यातील व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबला असून, व्यावसायिक पाईप गॅस पुरवठ्यातही कपात करण्यात येत आहे. उर्वरित बेकऱ्या पारंपरिक शेगड्या वापरत असल्या तरी त्यांची पुरवठा क्षमता अगदीच कमी आहे.
मुंबईतील 800 पैकी 450 बेकऱ्या उपनगरांमध्ये असून त्या सरपणावर चालणाऱ्या शेगड्या वापरतात. या बेकऱ्यांमधून मुंबईला फक्त 30 टक्के पुरवठा होतो.
सिलिंडर आणि पाईप गॅस पुरवठ्यात कपात झाल्याने बेकऱ्यांचे ब्रेड आणि पावचे उत्पादन कमालीचे घटले असून, त्याचा थेट फटका मुंबईकरांना होणाऱ्या पुरवठ्याला बसू लागला आहे. ज्या बेकऱ्यांमध्ये जुन्या चुली अजूनही आहेत त्या सुरू करण्याची परवानगी मागण्याचा प्रयत्न एका बेकरी चालकाने महापालिकेकडे केला असता मुंबईतील भयंकर प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर त्यास कायदेशीर सल्ला घेण्याचा रस्ता महापालिकेने दाखवला.
वडापाव आणि मुंबईकर हे समीकरणही सिलिंडर टंचाईने धोक्यात आले आहे. लालबागच्या लाडूसम्राटचे उदाहरण घेऊ. एक हजार स्क्वेअर फूट जागेत सकाळी 7 पासून दिवसभर दहा हजार वडापाव आणि साबुदाणा वडा विकणाऱ्या या लाडूसम्राटचे शटर बंद झाले आहे. त्यांना रोज सहा सिलिंडर लागतात. गुरुवारपर्यंत कसे तरी भागले आणि शुक्रवारी शटर बंद करावे लागले. संपूर्ण मुंबईतील छोट्या-मोठ्या हॉटेलांची हीच स्थिती झालेली दिसते. दादरचे आदर्श उपाहारगृह मंगळवारपासूनच बंद झाले.