राजेश सावंत
मुंबई: मुंबईतील १२ चौपाटींपैकी ८ चौपाटी आजही असुरक्षितच आहेत. यातील मलबार हिल परिसरातील टाटा गार्डन व राजभवन येथील समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास पर्यटकांना पूर्णपणे बंदी असून केवळ गिरगाव व जुहू चौपाटी पर्यटकांसाठी सुरक्षित आहेत.
मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना समुद्र चौपाट्या भुरळ घालतात. मुंबईकरही मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळी चौपाटीवर कुटुंबीयांसोबत फेरफटका मारण्यासाठी जातात. यावेळी अनेक जण समुद्राच्या पाण्यामध्ये उतरतात.
परंतु समुद्राच्या पाण्याचा अंदाज नसल्यामुळे बुडतात. आतापर्यंत समुद्रात बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने समुद्रकिनाऱ्यावर जीव रक्षकांची नेमणूक केली आहे. तरीही अधून-मधून जीवघेण्या घटना घडत असतात.
त्यामुळे राज्य सरकारने मुंबईतील समुद्र चौपाटींचा अभ्यास करून कोणत्या चौपाटी सुरक्षित व कोणत्या असुरक्षित याची यादी २००६ मध्ये जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार महापालिकेने १२ चौपाटींची यादी प्रसिद्ध केली असून यात केवळ जुहू व गिरगाव चौपाटी पाण्यात उतरण्यासाठी सुरक्षित असल्याचे जाहीर केले होते. मात्र पाण्यात उतरत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
वाळकेश्वर-वरळी, दादर, माहीम, बांद्रा-खार, आक्सा (दाणापाणी), मनोरी, गोराई, मार्वे या ८ चौपाटी असुरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या चौपाटी सुरक्षित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्यामुळे त्या आजही असुरक्षित आहेत.
खडकाळ भागासह पाण्याचा जोरदार प्रवाह, सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषित पाणी, व अन्य कारणामुळे या ८ चौपाट्या असुरक्षित असल्याची घोषित करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान राजभवन व टाटा गार्डन हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे येथे पर्यटकांना येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
२० वर्षांत सुरक्षा वाढली; धोका मात्र कायम!
२००६ मध्ये मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षिततेचा अभ्यास करून गिरगाव व जुहू वगळता आठ चौपाट्या असुरक्षित घोषित करण्यात आल्या. त्यानंतर २० वर्षांच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेने समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेसाठी जीवरक्षक, बचाव नौका, जेट स्की, लाइफबॉय, रेस्क्यू ट्यूब, दोरखंड आदी व्यवस्था उभारली.
२०२५ मध्ये सहा प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांच्या मदतीसाठी रोबोटिक लाइफबॉय आणण्याचा प्रस्तावही होता; मात्र तो प्रस्ताव रद्द करून नव्याने निविदा काढण्याचा निर्णय झाला.
२०२६ मध्येही समुद्रकिनाऱ्यांवरील जीवरक्षकांची संख्या वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र खडकाळ किनारा, जोरदार पाण्याचा प्रवाह, बदलती भरती-ओहोटी आणि प्रदूषणासारख्या मूलभूत समस्यांमुळे आठ चौपाट्यांचे ‘असुरक्षित’ वर्गीकरण कायम आहे.
त्यामुळे गेल्या २० वर्षांत बचाव यंत्रणा मजबूत झाली असली, तरी चौपाट्यांची मूळ जोखीम कमी करण्यात कितपत यश आले, हा प्रश्न उपस्थित होत आहे.गिरगाव चौपाटी - सुरक्षित, पोहण्यासाठी आणि मार्गदर्शित जलक्रीडांसाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे. जुहू चौपाटीवर वायसीएमए ते रुईया पार्कपर्यंत पोहण्याची सुविधााहे.
असुरक्षित चौपाट्या
वाळकेश्वर - वरळी - असुरक्षित, खडकाळ भाग
दादर चौपाटी - असुरक्षित, खडकाळ आणि प्रदूषित पाणी
माहीम - असुरक्षित, सांडपाणी विसर्जित
वांद्रे ते खार, असुरक्षित, खडकाळ
आक्सा बीच (दानापाणी) - असुरक्षित, मोठ्या प्रमाणात वर्दळ
मनोरी - असुरक्षित, पाण्याचा जोरदार प्रवाह
गोराई - असुरक्षित, पाण्याचा जोरदार प्रवाह
मार्वे - असुरक्षित, जोरदार पाण्याखालील प्रवाह
कोणतेही ठिकाण कायमस्वरूपी असुरक्षित नाही
समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षितता पर्यटकांची ये-जा आणि सध्याचा पाण्याचा प्रवाह व पाण्याची स्थिती या आधारावर ठरवली जाते. कोणतेही ठिकाण कायमस्वरूपी सुरक्षित किंवा असुरक्षित असल्याचे म्हणता येत नाही.
पाण्याची पातळी, जलक्रीडेचे प्रमाण, जोरदार प्रवाह, प्रदूषणाची पातळी, जमिनीची धूप आणि अशा अन्य कारणांमुळे ते ठिकाण सुरक्षित किंवा असुरक्षित ठरते, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
या चौपाट्यांवर बंदी
टाटा गार्डन - प्रतिबंधित क्षेत्र
राजभवन - प्रतिबंधित क्षेत्र