11th admission guidance Pudhari
मुंबई

11th admission guidance: अकरावी प्रवेशाचे यूट्यूब लाईव्हद्वारे आज मार्गदर्शन

राज्य शासनाच्या ‌‘इज ऑफ लिविंग‌’ उपक्रमांतर्गत यंदाही प्रवेश प्रक्रिया राज्यभरात पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून, त्याबाबतची सविस्तर माहिती या सत्राद्वारे दिली जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई विभागातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या लाखो विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने महत्त्वाचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ, चुका आणि अनिश्चितता टाळण्यासाठी (शनिवारी) 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विशेष यूट्यूब लाईव्ह सत्र आयोजित केले असून, या माध्यमातून संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचा उलगडा होणार आहे.

राज्य शासनाच्या ‌‘इज ऑफ लिविंग‌’ उपक्रमांतर्गत यंदाही प्रवेश प्रक्रिया राज्यभरात पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून, त्याबाबतची सविस्तर माहिती या सत्राद्वारे दिली जाणार आहे.

विशेष यूट्यूब लाईव्हसत्रात मुंबई विभागातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, दहावीचे वर्गशिक्षक आणि तंत्रज्ञांनाही सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी प्रशासकीय यंत्रणेसाठी झूम मीटिंगद्वारे विशेष बैठक घेतली जाणार आहे, ज्याची लिंक व्हॉट्सॲप ग्रुपवर उपलब्ध करून दिली जाईल. या माध्यमातून ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम (ऑप्शन फॉर्म) कसे निश्चित करायचे, गुणवत्ता यादी व प्रवेशाच्या विविध फेऱ्यांची प्रक्रिया कशी असते, याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

मार्गदर्शनाचा फायदा

  • ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची स्टेप-बाय-स्टेप माहिती

  • महाविद्यालय निवड (प्रेफरन्स लिस्ट) कशी करावी, चुका टाळण्यासाठी मार्गदर्शन

  • कट-ऑफ, मेरिट लिस्ट, राऊंड्स यांची स्पष्ट समज

  • चुकीमुळे ॲडमिशनहुकू नये यासाठी टिप्स

  • आवश्यक कागदपत्रांची माहिती

महाविद्यालयांसाठी नोंदणीचे बंधन; चुकलात तर प्रवेश प्रक्रियेतून बाहेर!

मुंबई विभागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना (मुंबई, ठाणे, रायगड, पालघर) प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आपली नोंदणी अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. एकदा नोंदणी फायनल केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे माहिती भरताना अचूकता राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यासाठी विशेष जिल्हानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दक्षिण, उत्तर, पश्चिम मुंबई आणि पालघर जिल्ह्यासाठी 17 एप्रिल रोजी चर्नी रोड येथील द बीजेसीपी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, तर ठाणे व रायगड जिल्ह्यासाठी 18 एप्रिल रोजी ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात शिबिर होईल.

सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरांमध्ये महाविद्यालयांच्या त्रुटी दूर करून त्यांची नोंदणीचे मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाना इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करण्याबाबत परवानगी मिळालेली आहे, अशा उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी 2026-27 या वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी 13 एप्रिलपर्यंत विभागीय कार्यालयास प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज भरताना होणाऱ्या सामान्य चुका टाळण्यासाठी मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती आणि प्रवेश प्रक्रियेचे अचूक वेळापत्रक या सत्रातून स्पष्ट केले जाणार आहे. चुकीच्या निवडीमुळे विद्यार्थ्यांनी प्रवेशाची संधी गमावू नये, तसेच योग्य महाविद्यालयाची निवड करताना त्यांनी आत्मविश्वासाने आणि योग्य नियोजनाने निर्णय घ्यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
-राजेश कंकाळ, विभागीय शिक्षण उपसंचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT