नवी मुंबई: मोरबे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, धरण रविवारी सकाळपर्यत ८०.३० टक्के भरले आहे. मान्सूनच्या सुरुवातीपासून धरण परिसरात सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी नवी मुंबई शहरातील लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याबाबतची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.
शनिवारी दिवसभरात मोरबे धरण परिसरात ४३ मिमी पावसाची नोंद झाली. तर १ जूनपासून आजपर्यंत एकूण २५०८.८ मिमी पाऊस झाला आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ८३.९८ मीटर इतकी असून धरणातील एकूण जलसाठा ८०.३० टक्के इतका झाला आहे. धरण ८८ मीटरला पूर्ण क्षमतेने भरते.
यंदाच्या मान्सूनमध्ये जुलै महिन्यापासून पावसाचा जोर कायम राहिल्याने मोरबे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढत असून, आगामी काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोरबे धरणावर नवी मुंबई शहराचा पिण्याच्या पाण्याचा मोठा भार अवलंबून आहे. त्यामुळे धरणातील वाढता जलसाठा हा नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनासाठी तसेच नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे. पुरेसा जलसाठा उपलब्ध झाल्याने पाणी चिंता मिटली.