मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात वसई-विरार, मिरा-भाईंदर या परिसरासाठी दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विविध मेट्रो मार्गिकांद्वारे महामुंबईला मुंबई शहर व उपनगराशी जोडण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशात एकूण 337 किमीचे मेट्रो मार्गिकांचे जाळे विणले जात आहे. याचा लाभ वसई-विरार, मिरा-भाईंदर या परिसरातील प्रवाशांना होणार आहे. ठाण्याजवळील गायमुख येथून मिरारोडच्या शिवाजी चौकपर्यंत मेट्रो 10 मार्गिकेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद आहे. याच मार्गिकेचा पुढे विरारपर्यंत विस्तार करून मेट्रो 13 उभारली जाईल. यासाठी 200 कोटींची तरतूद आहे. दहिसर ते मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. या मार्गिकेचा दहिसर ते काशिगाव हा टप्पा तयार झाला आहे. मेट्रो 9 मार्गिका मुंबईतील मेट्रो 7 मार्गिकेला थेट जोडली जाईल. यामुळे गुंदवली ते काशिगाव थेट प्रवास शक्य होणार आहे.
तसेच गुंदवली ते विमानतळ अशी मेट्रो 7 अ मार्गिका उभारली जात आहे. मेट्रो 9 आणि 7 अ या मार्गिकांची कामे पूर्ण झाल्यानंतर विमानतळापासून ते मिरा-भाईंदरपर्यंत मेट्रो न बदलता प्रवास करता येईल. या दोन्ही मार्गिकांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1151.87 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रोद्वारे प्रवाशांना सुलभ प्रवासाची सोय तर उपलब्ध होईलच पण वसई-विरार, मिरा-भाईंदर या महानगरपालिकांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणी पुरवठ्याची सुविधाही देण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे देहरजी धरण बांधून 93.22 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण केला जाणार आहे. यासाठी 247.07 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. या धरणाचे सध्या 82 टक्के काम पूर्ण झाले आहे. डहाणू येथे सुर्या नदीवर बंधारे बांधले जाणार आहेत.
मेट्रो 9 - दहिसर ते मिरा-भाईंदर आणि मेट्रो 7 अ - विमानतळ ते मिरा-भाईंदर - 1151.87 कोटी
मेट्रो 10 - गायमुख ते शिवाजी चौक, मिरारोड - 100 कोटी
मेट्रो 13 - शिवाजी चौक 200 कोटी