मुंबई : मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या माध्यमातून महानगर क्षेत्राच्या वाढत्या शहरीकरणाच्या गरजा ओळखून सर्वांगीण विकास साधला जाईल. त्यादृष्टीने एमएमआरडीच्या बैठकीत 48 हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. यातून ठाणे आणि कल्याण या दोन शहरांचा कायापालट होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्याला मोबिलिटी हब म्हणून विकसित करताना कल्याण हे भविष्यातील प्रगत शहरी केंद्र म्हणून उदयास येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ठाणे शहर हे मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशद्वार मानून येथे 12 ते 13 हजार कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 12 किमी लांबीचा ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 2026-27 या वर्षाकरिता 3 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याला एकूण 18 हजार 838 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
यासोबतच ठाण्यात मेट्रोचे जाळे विकसित करण्यात असून कासारवडवली ते वडाळा मेट्रो 4, मेट्रो 4-ए (गायमूखपर्यंत विस्तार) आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या प्रकल्पांमुळे ठाणे-मुंबई कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होईल. ठाणे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 हजार 25 कोटी आणि आनंदनगर-साकेत उन्नत मार्गासाठी 880 कोटी खर्च केले जाणार आहेत. तर रायलादेवी आणि मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणासह कोलशेत-काल्हेर खाडी पुलासाठी 214 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदेशातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पोशीर आणि शिलार या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.
एमएमआर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 337 किमी मेट्रो जाळ्यासोबत पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राउंड रस्ते आणि प्रकल्पांचा आराखडा राबवण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कल्याण रिंग रोडसाठी 600 कोटींची तरतूद
भविष्यातील नियोजित शहरी केंद्र म्हणून कल्याण-डोंबिवली परिसराचा विस्तार होणार असून येथे 2 हजार 500 ते 3 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 1 हजार 239 कोटींच्या कल्याण रिंग रोड या प्रकल्पाकरिता 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भिवंडी-कल्याण मेट्रो 5, उल्हासनगर विस्तार 5-ए आणि कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो 14 मुळे कल्याण हे एमएमआरमधील महत्त्वाचे ट्रान्झिट हब बनेल. ऐरोली-काटई नाका मार्ग 584 कोटींच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबईशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.