मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाची 5 हजार घरांची सोडत पुढील महिन्यात काढण्यात येणार आहे. यातील बहुतांश घरे अल्प व मध्यम उत्पन्न गटांसाठी असतील. त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटाची निराशा होणार आहे.
सोडतीत घेण्यात येणाऱ्या घरांपैकी 2500 घरे पत्राचाळीत आहेत. ही सर्व अल्प व मध्यम उत्पन्न गटाची घरे आहेत. मागाठाणे येथील 20 मजली इमारत 2027 पर्यंत पूर्ण होईल. येथे उच्च उत्पन्न गटासाठी 128 घरे आहेत. भाबरेकरनगर प्रकल्प उच्च गटासाठी 20, मध्यम गटासाठी 61 घरे असून ती 2029 पर्यंत पूर्ण होतील. प्रतीक्षानगर येथे 22 मजल्यांच्या तीन इमारतींचे काम अंतिम टप्प्यात असून येथे मध्यम गटासाठी 264 घरे उपलब्ध होतील. चौथ्या इमारतीच्या पायाचे काम झाले असून आणखी दोन चाळी पाडल्या जाणार आहेत.
कन्नमवारनगर येथील प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होईल. येथे मध्यम गटासाठी 1200 आणि अल्प गटासाठी 200 घरे असतील. चेंबूरच्या टिळकनगर येथे 111 आणि कुर्ला नेहरूनगर येथे 55 घरे बांधली जात आहेत. ही घरे मध्यम व अल्प गटासाठी आहेत. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांतील बहुतांश घरे आगामी सोडतीत घेतली जाण्याची शक्यता आहे; मात्र म्हाडाने अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मार्चमध्ये जाहिरात काढून एप्रिलमध्ये सोडत निघण्याची शक्यता आहे.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर 1 भूखंडावर 32 माळ्यांची तर आर 13 भूखंडावर 38 माळ्यांची इमारत बांधली जाणार आहे. आर 4 आणि आर 7 या भूखंडांवर प्रत्येकी 34 माळ्यांच्या इमारती बांधल्या जाणार आहेत. या प्रकल्पात उच्च उत्पन्न गटासाठी 133, मध्यम उत्पन्न गटासाठी 1 हजार 242 आणि अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 23 घरे बांधली जाणार आहे. साधारण 3 वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण होईल. गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच पत्राचाळ प्रकल्पाचे कार्यादेश निघाले होते; मात्र अद्याप पर्यावरण मंजुरी प्रलंबित आहे. त्यामुळे ही घरे सोडतीत येण्याबाबत संभ्रम आहे.