मुंबई: महायुतीतील मतभेदाचा मुख्य मुद्दा असणारा निधीवाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची बैठक घेऊन त्यात यशस्वी तोडगा काढला आहे. आता जिल्हा नियोजन निधीपैकी ७० टक्के निधी स्थानिक विधिमंडळ सदस्यांना जाणार आहे, ३० टक्के निधी वाटपाचा अधिकार संबंधित पालकमंत्री यांना असणार आहे, ते समन्वयाने या निधीचे वाटप करतील.
तसेच सर्व महामंडळांवर येत्या महिनाभरात महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची सोमवारी रात्री बैठक पार पडली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित होते. या बैठकीत महामंडळांचे वाटप आणि नियुक्त्यांसोबतच जिल्हा विकास निधी, महायुतीतील समन्वय आदी मुद्दयांवर चर्चा करण्यात आली.
राज्यात १७० महामंडळे आहेत. त्यांचे साडेसहाशेवर सदस्य आहेत. त्यावर तातडीने महिनाभरात महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार नियुक्ती करण्यावर एकमत झाले. सोबतच विशेष कार्यकारी अधिकारी, जिल्हा स्तरीय समित्या देखील नेमण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
महायुतीत विसंगत विधाने, वाद नको
राज्यात महायुतीतील कोणत्याही घटकपक्षाच्या विरोधात आणि विसंगत भूमिका घेत एकमेकांवर टीकाटिप्पणी करणे टाळले पाहिजे. महायुतीची सामूहिक भूमिकाच जनतेसमोर गेली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची सोमवारी रात्री बैठक पार पडली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित होते. राज्यातील तिन्ही पक्षांमध्ये, तसेच महायुतीमधील सर्व बारा घटक पक्षांमधील समन्वय अधिक मजबूत व्हावा, हा बैठकीचा प्रमुख उद्देश होता, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महायुतीने महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रचंड मजबुतीने आणि एकजुटीने काम केले पाहिजे, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. जनतेला दिलेली आश्वासने, संकल्पनामा पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्या दिशेने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या संदर्भात सर्व नेत्यांना, आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट दिशा दिल्याचेही त्यांनी सांगितले.