Maharashtra Weather Update
राज्यातील बहुतांश ठिकाणी मंगळवारी झालेल्या मान्सूनपूर्व जोरदार पावसाने हाहाकार उडाला. मंगळवारी मुंबईसह (Mumbai Rains) पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणाला पावसाचा फटका बसला. अनेक ठिकाणी रस्त्यात पाणी तुंबल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. दरम्यान, आज बुधवारी (२१ मे) मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या २४ तासांत मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरांत सुमारे ४० ते ७० मिलिमीटर पाऊस पडला. हा पाऊस मंगळवारी संध्याकाळी ६.३० ते रात्री ११.३० दरम्यान झाला. यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. आज (२१ मे) सकाळच्या सॅटेलाईट छायाचित्रानुसार, महाराष्ट्र आणि मुंबईसह लगतच्या भागावर ढगांची गर्दी दिसून आली.
कर्नाटक किनाऱ्याजवळ चक्रावात सक्रीय झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे २२ मे च्या दरम्यान याच भागात कमी दाब क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. ते उत्तरेकडे सरकून आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २४ मे पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागात वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
मुंबईसाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे आणि रायगडसाठीदेखील यलो अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गोव्यातही मंगळवारी मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. गेल्या २४ तासांत म्हापसा येथे २०२ मिलिमीटर आणि पेडण्यात २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. साखळी, दाबोळी, पणजी, धारबांदोडा, मुरगाव, केपे तालुक्यातही १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला आहे.
गोव्यात आजदेखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. गोव्यात पुढील काही तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.