मुंबई : सातारा जिल्ह्यातील घटनेचा आपणही साक्षीदार असून, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मला शंभूराज देसाई यांनी फोन करून दोन मतदारांवर जुना गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देसाई आणि मकरंद पाटील यांच्या बाजूने बहुमत होते.
त्यांची मते कमी करून त्यांना पराभूत करण्यासाठी असा प्रकार केला जाईल, अशी शंका होती. त्यामुळे, कोणालाही मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही. त्या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे आपण तुषार दोशी यांना फोन करून सांगितल्याचे शिंदे म्हणाले.
मतदानापासून रोखणे हा लोकशाहीचा खून आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करू नका, असेही आपण बजावले. त्यानंतर पोलीस महासंचालकांनाही फोन करून याबद्दल सांगितले. यावर त्यांनी आमचे लोक कुठल्याही परिस्थितीत सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले होते; पण त्यानंतरही सदस्यांना मतदानापासून अडवण्यात आले. पोलीस मंत्र्यांना आणि मतदारांना आरोपीप्रमाणे पकडून घेऊन गेले.
नेमक्या दोनच सदस्यांना पोलिसांनी कसे काय अडवले, असा प्रश्न करत महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली. एखाद्याला मतदानापासून वंचित ठेवण्याची घटना यापूर्वी कधी घडली नव्हती, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेल्या वस्तुस्थितीच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. या चौकशीत जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केले.