

मुंबई: मुंबई शहर व उपनगरांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. मुंबई आयएमडीच्या सांताक्रूझ वेधशाळेमध्ये शनिवार ते सोमवार (21 ते 23 मार्च) या तीन दिवसांमध्ये कमाल तापमान सरासरी 36 अंश सेल्सिअस इतके नोंदले.
गेल्या शनिवारी कमाल तापमानाने पस्तीशी गाठली. रविवारी त्यात थेट दोन अंशांनी वाढ झाल्याने भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेची लाट (यलो अलर्ट) घोषित केली. या अलर्ट सोमवारीही कायम होता. तसेच मंगळवारी 36 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता असल्याने उष्णतेच्या लाटेचा परिणाम मंगळवारीही जाणवण्याची शक्यता वाढली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मुंबई आणि आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. सध्या कर्नाटकच्या दक्षिणेपासून चक्राकार वारे वाहत असून मध्य महाराष्ट्रपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा परिसरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह मुंबईत मात्र प्रचंड दमट हवामान असेल, असे आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
21 मार्च 35 अंश सेल्सिअस
22 मार्च 37 अंश सेल्सिअस
23 मार्च 38 अंश सेल्सिअस
24 मार्च 36 अंश सेल्सिअस (अपेक्षित)