Maharashtra Vidhan Parishad Election 2026
मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आक्रमक रणनीती आखली असून, एकूण १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांपैकी ७ जागांवर निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये सध्या असलेला जागावाटपाचा फॉर्म्युला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अजिबात मान्य नाही. ज्या भागात पक्षाची ताकद मोठी आहे, तिथे शिवसेनेलाच जागा मिळावी, असा आक्रमक आग्रह स्थानिक नेत्यांनी नेतृत्वाकडे धरला आहे.
शिवसेना निवडणूक रणनीतिकारांनी विजयाचे गणित जुळवू शकणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. प्रामुख्याने ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि हिंगोली येथे जोरदार तयारी सुरू केल्याचे समजते. सातही ठिकाणी शिवसेनेचे वरिष्ठ नेते माहिती गोळा करणे, स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि अंतर्गत सर्व्हे करणे अशी कामे करत आहेत.
ठाणे आणि पालघर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, इथे भाजप आणि शिवसेनेत थेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. येथे भाजपचे ४४४ नगरसेवक तर शिवसेना (शिंदे गट) ३२६ नगरसेवक आहेत. इथे खरी चुरस आहे. भाजप आपल्या संख्याबळाच्या जोरावर या जागेसाठी आग्रही आहे, तर एकनाथ शिंदेही या जागेसाठी आग्रही आहेत.
स्थानिक पातळीवर नेत्यांचा दबाव वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिक जागांसाठी आपला आग्रह कायम ठेवणार हे आता स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण वादावर आता महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो, यावरच महायुतीचे भवितव्य आणि जागावाटपाचे अंतिम चित्र अवलंबून असणार आहे.