

मुंबई : दिलीप सपाटे
लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महापालिका निवडणुकीत पिछेहाट झाली आहे. ठाणे वगळता अन्य बालेकिल्ल्यांत भाजपाने शिवसेनेला धक्का दिला आहे. यापूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेली अनेक शहरे भाजपाने जिंकली आहेत.
29 महापालिकांमध्ये ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेची सरशी झाली आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करत 131 पैकी 75 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. कल्याण - डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती. या लढतीत शिवसेनेने 122 पैकी 54 जागा जिंकत सरशी साधली असली तरी भाजपानेही 51 जागा जिंकल्या आहेत.
दोघांना जवळपास समान जागा मिळाल्याने तेथे महापौरपदावरून रस्सीखेच रंगणार आहे, तर उल्हासनगरमध्ये भाजपाने शिवसेनेवर सरशी साधली. तेथे भाजपाला 37, तर शिवसेनेला 36 जागा मिळाल्या आहेत, तर शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात भाजपाने नवी मुंबई, मिरा-भाईंदरमध्ये स्वबळावर सत्ता मिळविली आहे. नवी मुंबईत एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते वनमंत्री गणेश नाईक एकमेकांना भिडले होते. त्यात नाईकांनी इशारा दिल्याप्रमाणे शिंदेंचा टांगा पलटी केला. तर, मिरा- भाईंदरमध्ये भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेला जबर धक्का दिला. या महापालिकेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली ताकद पणाला लागली होती. पण, तेथे शिवसेनेला फक्त 3 जागा जिंकता आल्या.
मुंबईत एकनाथ शिंदे यांनी 90, तर भाजपाने 137 जागा लढविल्या होत्या. त्यात शिंदेंना 28 जागांपर्यंत मजल मारता आली. 90 पैकी 62 जागांवर शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. निवडणुकीपूर्वी शिंदेंनी उबाठा शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक फोडून त्यांना ताकद दिली होती. मात्र, त्यातील अनेकांना पराभव पत्करावा लागला. माजी नगरसेवक आले तरी उबाठाचे केडर मात्र, उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना येथे भाजपाने शिवसेनेला मोठा फटका दिला आहे. या ठिकाणी युतीबाबत चर्चा सुरू होती. मात्र, भाजपाने अखेरच्या क्षणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. तो भाजपाच्या पथ्यावर पडला.
कोल्हापूर, जळगाव, परभणी, नांदेड येथेही शिवसेनेला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ठाणे वगळता या निवडणुकीत मिळालेले यश शिंदेंना फारसे समाधानकारक नाही. या निकालाने महायुतीमध्ये भाजपाचे वर्चस्व अधिक वाढणार आहे.