मुंबई : यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व स्तरांची मते जाणून घेण्यात आली. यावेळी सदस्य सचिव संजय यादव, डॉ.अपर्णा मॉरिस, डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी, डॉ. मधुश्री सावजी, शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ हे व्यासपीठावर उपस्थित होते. pudhari photo
मुंबई

Maharashtra trilingual policy : मुलांवर ताण नको, वयोगटानुसार शिकवा भाषा

त्रिभाषा समितीच्या मुंबईतील चर्चासत्रातील सूर, मातृभाषेच्याच बाजूने बहुमत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबवताना पहिलीपासून हिंदी शिकवावी की पाचवीपासून, या प्रश्नावर अनेकांचे मतभेद आहेत. काही पालकांना मुलांवर ताण नको, वयोगटानुसार भाषा शिकवा, असे मत व्यक्त केले तर अनेकांनी पाचवीपासूनच योग्य आणि पुरेशी वाटत असल्याचे सांगितले. तर अनेक शिक्षकांनी पहिली ते पाचवीपर्यंत पूर्णपणे मातृभाषेत शिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे मत नोंदविले. शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव, शिक्षणाचा ताण आणि अभ्यासाचे ओझे यांवरही चर्चा झाली.

यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व स्तरांची मते जाणून घेण्यात आली. यावेळी सदस्य सचिव संजय यादव, डॉ.अपर्णा मॉरिस, डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी, डॉ. मधुश्री सावजी, शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ हे व्यासपीठावर उपस्थित होते.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, हिंदी पाचवीपासून सुरू करावी, पण गुण न देता ग्रेड दिली जावी. भाषा आवडीसाठी शिकवली पाहिजे, फक्त गुण मिळवण्यासाठी नाही, असे म्हणाले. पुरोगामी शिक्षक संघटनेचे अमित कारंडे म्हणाले, तिसरी भाषा शिकवण्यापेक्षा मुलांना एआय, कोडिंग, तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्यांवर लक्ष द्यावे. तिसरी भाषा फक्त गुण मिळवण्यासाठी नको, तर मुलांच्या शिक्षणाच्या अनुभवाचा भाग असावी, असे म्हणाले.

हंसराज पब्लिक स्कूलच्या उमा ढेरे, म्हणाल्या, एनईपी लवचिक आहे, त्यामुळे पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याऐवजी, मुलांच्या वयोगटानुसार भाषा शिकवली पाहिजे. पहिलीपासून मौखिक भाषा, मूल्यशिक्षण दिले पाहिजे, प्राथमिक स्तरावर मातृभाषेवर भर देणे आवश्यक आहे, तर हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा नंतर येणे फायदेशीर ठरेल.

प्राचार्य मुकुंद आंधळकर यांनी सांगितले की मराठी शिक्षण सक्तीची असावे, पाचवीपासून हिंदी असावी. अनिल बागडे म्हणाले, सहावीपासून हिंदी सुरू केली पाहिजे. मुलांवर ताण येऊ नये, आणि त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध करणे आवश्यक आहे. शिक्षण तज्ज्ञ गिरीश सामंत यांनी राज्य व केंद्राने जे दस्तावेज उल्लेख करत त्यात कुठेही तिसरीपासून त्रिभाषा शिकवावी असे स्पष्ट केलेले नाही. चौथीपर्यंत केवळ मातृभाषा शिकवणे आणि उच्च शिक्षणासाठी इंग्रजीची तयारी करणे योग्य आहे.

बालमोहनची आर्या भगत म्हणाली, संस्कृत आठवीत अचानक सुरू होते, त्यामुळे मुलांना ताण येतो. जर पहिलीपासून शिकवली गेली किंवा स्पष्ट रचना ठेवली गेली, तर आकलन क्षमता वाढेल. नववीत असलेली रूही बांदेकर म्हणाली, आठवीत स्पॅनिश, फ्रेंच शिकवल्या जातात. अभ्यासासोबत कलाविष्काराची जोड हवी काही विद्यार्थ्यांनी तिसरी भाषा त्यांच्या कानावर पडेल अशा प्रकारची असावी, असेही सुचवले. शिक्षण विकास मंचाचे डॉ. माधव सूर्यवंशी यांनी समितीस निवेदन सादर केले.

या प्रश्नांवर झाले विचारमंथन

राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण कसे राबवावे, कोणती भाषा कोणत्या वर्गापासून अनिवार्य असावी, मुलांवर भाषांचा ताण टाळण्यासाठी काय पद्धत योग्य ठरेल आणि मातृभाषेचे शिक्षण कोठून सुरु करावे या सर्व प्रश्नांवर चर्चा झाली. शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्यात दौरे करुन मुंबईतील शाळा, शिक्षक, पालक- विद्यार्थ्यांचे मत जाणून घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT