मुंबई : अदिती कदम
जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त महाराष्ट्रातील थॅलेसेमियाबाबत समोर आलेली आकडेवारी चिंताजनक ठरत आहे. राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांची संख्या आता 13 हजारांच्या पुढे पोहोचली असून, एकट्या मुंबई शहरात सर्वाधिक 3420 रुग्णांची नोंद झाली आहे, तर पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, आणि नाशिक हे जिल्हेही उच्च जोखमीच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.
थॅलेसेमिया मुक्त भारत अभियानांतर्गत राज्य सरकारकडून बोन मॅरो ट्रान्सप्लांट, मोफत जनुकीय तपासणी, एचएलए टायपिंग शिबिरे आणि औषधसाठा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, वेळेत तपासणी, विवाहपूर्व स्क्रीनिंग आणि गर्भावस्थेतील जनुकीय चाचण्या हेच या आजाराला रोखण्याचे प्रभावी उपाय ठरू शकतात.
राज्य सरकारकडून बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी 9.5 लाख ते 17 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदतीला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी, कोल इंडिया निधी आणि पंतप्रधान सहायता निधीच्या माध्यमातून 8 मे 2025 पासून आतापर्यंत राज्यातील 90 मुलांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले आहेत.
हे उपचार ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर बीएमजेएच रुग्णालय, बेंगळुरू, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, कोकिलाबेन रुग्णालय येथे करण्यात येतात.गडचिरोली जिल्हा रुग्णालयात कॉम्प्रिहेन्सिव्ह डे-केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, नंदुरबार येथेही अशाच केंद्राची प्रक्रिया सुरू आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथे गर्भावस्थेदरम्यान थॅलेसेमियाची ओळख पटविण्यासाठी सीव्हीएस जनुकीय तपासणी मोफत करण्यात येत आहे.
नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे आयोजित एचएलए टायपिंग शिबिरांमध्ये 162 कुटुंबांतील 648 जणांची बोन मॅरो क्रॉस मॅचिंग तपासणी करण्यात आली. सर्व नमुन्यांची तपासणी जर्मनीतील डीकेएमएम लॅबकडून मोफत करण्यात आली असून, 17 मुलांना योग्य बोन मॅरो डोनर मिळाल्याची माहिती देण्यात आली.
13.72 लाख तपासण्या
एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत राज्यात 13 लाख 72 हजार 489 एचपीएलसी आणि एचबी इलेक्ट्रोफोरेसीस तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 2 लाख 3 हजार 340 गर्भवती महिलांच्या एएनसी तपासण्यांचा समावेश होता. या तपासण्यांमध्ये 31 हजार 552 थॅलेसेमिया मायनर आणि 30 मेजर रुग्ण आढळले.
औषधसाठा पुरेसा असल्याचा दावा
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, थॅलेसेमिया रुग्णांसाठी लागणाऱ्या औषधांचा राज्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे. ई-औषधी पोर्टलवरील 21 एप्रिल 2026 च्या आकडेवारीनुसार राज्यात 2.59 लाखांहून अधिक गोळ्यांचा साठा उपलब्ध आहे. ठाणे, अहिल्यानगर, परभणी, नागपूर, धाराशिव आणि लातूर येथे सर्वाधिक औषधसाठा असल्याचे सांगण्यात आले. मात्र काही जिल्ह्यांमध्ये औषधसाठा शून्यावर गेल्याने भविष्यातील पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.