मुंबई : राजेश सावंत
वर्षभरात शंभर दिवसही शाळेत जाता आले नाही. निवडणूक कामातून सुटतो ना सुटतो तेच बीएलओ म्हणून एसआरआयसाठी जुंपले. ते काम सुरू असतानाच आता जनगणनेसाठी प्रगणक म्हणून ड्युटी लावली आहे. त्यामुळे आम्ही शिक्षक आहोत हेच विसरून गेलो आहोत, अशी भावना नाव न छापण्याच्या अटीवर एका महिला शिक्षकेने व्यक्त केली आहे.
याच भावना मुंबईतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या आहेत. त्यांच्या मनात संताप आहे, मात्र व्यथा सांगणार तरी कोणाला, असा प्रश्न असून निमूटपणे ही सर्व कामे करीत आहेत. मुंबईतील सुमारे अडीच हजार शिक्षकांना जनगणनेसाठी प्रगणक म्हणून काम दिले आहे.
मुंबईतील प्राथमिक शाळांमध्ये सर्वाधिक महिला शिक्षिका असून त्यांना शाळा सांभाळून निवडणूक संदर्भातील कामे व अन्य कामे करावी लागत आहेत. सध्या विविध शाळांमध्ये परीक्षा सुरू असून त्यानंतर विद्यार्थ्यांचे पेपर तपासणे व त्याचा निकाल तयार करणे ही कामे शिक्षकांकडे आहेत. त्याशिवाय मतदार यादीची फेर तपासणी करून मतदारांची नावे निश्चित करण्याची कामे बीएलओ म्हणून शिक्षकांवर सोपवण्यात आली आहेत.
यातील काही शिक्षकांचे घरगुती समस्या, यात कुटुंबातील आजारी व्यक्ती, स्वतःचा आजार, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी ही ड्युटी रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु ती निवडणूक विभागाकडून अमान्य केल्यामुळे जवळपास सर्वांनीच ही कामे नाईलाजाने स्वीकारली आहेत.
शाळेतील जबाबदारी व निवडणुकीची कामे सुरू असताना आता या शिक्षकांना जनगणनेचे काम करण्याचे मेल करण्यात आले आहेत. यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयात नियुक्ती आदेश स्वीकारण्याचे नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांचे टेन्शन अजूनच वाढले.
कारवाईची धमकी
निवडणूक कर्तव्यावर अनेक शिक्षक रुजू झालेले असतानाही निवडणूक विभाग, मुख्याध्यापक, पोलिस, मुंबई महापालिका शिक्षण विभागामार्फत रुजू न झाल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल. एवढेच नाही तर आपले वेतनही काढले जाणार नसल्याची धमकी दिली जात आहे. त्यात रुजू झालेल्या शिक्षकांची नावे टाकत उपशिक्षणाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.
निवडणूक आयोगाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी घेण्याचे मार्गदर्शक तत्व बनवले आहे. त्यानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी घेणे आवश्यक आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह अनेक कामे असतात. त्यामुळे त्यांना अन्य कामात गुंतवून विद्यार्थ्यांचे नुकसान का केले जाते. त्यामुळे शिक्षकांना निवडणूक व अन्य कामातून वगळण्यात यावे.रमाकांत बने, कामगार नेते