मुंबई : गुरुवारी झालेल्या कोल्हापूरसह 11 महापालिकांच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने दमदार वर्चस्व प्रस्थापित केले असून, अहिल्यानगरचा अपवाद वगळता सर्वत्र भाजपचे महापौर निवडून आले.
कोल्हापूरसह पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, जळगाव, धुळे, अमरावती, नाशिक, जालना , नांदेड आणि अहिल्यानगर या महानगरपालिकांमध्ये शुक्रवारी महापौर निवडी पूर्ण झाल्या.
सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने कोंड्याल यांचा मार्ग मोकळा झाला.
जळगाव महानगरपालिकेत भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी निवड झाली असून शिवसेनेच्या मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. दीपमाला काळे यांनी जळगाव महापालिकेच्या 17व्या महापौर म्हणून पदभार स्वीकारला.
नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी 104 मते मिळवत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. तर, उपमहापौरपदी लीला हाथीबेड यांची निवड झाली.
नाशिकमध्ये भाजपच्या हीमगौरी आडके या महापौर तर शिंदे गटाचे विलास शिंदे उपमहापौर बनले. इथे शिंदे सेनेला उपमहापौरपदाची अनपेक्षित लॉटरी लागली.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे रवी लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची निवड झाली.
धुळे महानगरपालिकेत तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या मायादेवी परदेशी यांनी 50 मते मिळवून महापौरपद जिंकले. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या संयुक्त उमेदवाराला केवळ 13 मते मिळाली. उपमहापौरपदावर ज्योत्स्ना पाटील यांची निवड झाली. अहिल्यानगरमध्ये मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्योती गाडे या महापौर बनल्या असून भाजपचे धनंजय जाधव हे उपमहापौर बनले आहेत.
नांदेड महानगरपालिकेत प्रथमच भाजपचा महापौर निवडून आला आहे. 81 पैकी 45 जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून महापौरपदासाठी कविता मुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उपमहापौरपदासाठी दीपकसिंह रावत यांची निवड निश्चित झाली आहे. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्योती गाडे या महापौर बनल्या असून भाजपचे धनंजय जाधव हे उपमहापौर बनले आहेत.