मुंबई: बारावीनंतर वैद्यकीय शिक्षणाची वाट निवडलेल्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला स्पष्ट पसंती दिल्याचे राज्यातील पहिल्या प्रवेश फेरीच्या निकालातून दिसून आले आहे. एमबीबीएसच्या ८ हजार १२९ जागांपैकी तब्बल ६ हजार ८७६ जागांवर प्रवेश झाले असून, बीडीएसच्या २ हजार ५१७ जागांपैकी केवळ १ हजार १२५ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत.
दोन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून १० हजार ६४६ जागांपैकी ८ हजार १ जागांवर प्रवेश झाले असून, २ हजार ६४५ जागा दुसऱ्या फेरीसाठी रिक्त राहिल्या आहेत.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या राज्य कोट्यातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण झाली.
या फेरीत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी मिळालेली जागा ‘फ्रीज’ केली असून, ६ हजार ६८४ विद्यार्थ्यांनी ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या ४ हजार ९८० जागांपैकी ४ हजार ६६५ जागांवर प्रवेश झाले. त्यामुळे या जागांपैकी ९३.६७ टक्के जागा पहिल्याच फेरीत भरल्या असून, केवळ ४१५ जागा रिक्त राहिल्या आहेत. यापैकी ८८८ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची जागा ‘फ्रीज’ केली, तर ३ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडला.
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या ३ हजार १४९ जागांपैकी २ हजार ३११ जागांवर प्रवेश झाले आहेत. या जागांपैकी ७३.३८ टक्के जागा भरल्या असून, ८३८ जागा रिक्त आहेत.
यापैकी २४९ विद्यार्थ्यांनी जागा ‘फ्रीज’ केली, तर २ हजार ६२ विद्यार्थ्यांनी ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडला. तर बीडीएसच्या प्रवेशामध्ये जागा रिकामी राहिल्या आहेत. २ हजार ५१७ जागांपैकी १ हजार १२५ जागांवर प्रवेश झाले असून, १ हजार ३९२ जागा रिक्त आहेत.
शासकीय महाविद्यालयांतील ३१७ जागांपैकी १९६ जागा भरल्या असून, १२१ जागा रिक्त राहिल्या आहेत. तर खासगी महाविद्यालयांतील २ हजार २०० जागांपैकी केवळ ९२९ जागांवर प्रवेश झाले असून, तब्बल १ हजार २७१ जागा रिक्त आहेत.
पहिल्या फेरीनंतर आता रिक्त राहिलेल्या जागांसाठी आता दुसरी केंद्रीभूत प्रवेश फेरी होणार आहे. या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील ७ सप्टेंबरला जाहीर केला जाणार आहे.