मुंबई: 1 मे 2026 पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. हा अन्यायकारक निर्णय रद्द करा, अन्यथा 4 मेपासून प्रत्येक जिल्ह्यात चालक रोज निदर्शने करतील, असा इशारा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने मुंबईत सोमवारी दिला.
याबाबत कृती समिती अध्यक्ष शशांक राव यांनी मराठी पत्रकार संघात भूमिका स्पष्ट केली. यावेळी सरचिटणीस विलास भालेकर, मुंबई ऑटो-टॅक्सी युनियनचे शंकर साळवी, कार्याध्यक्ष मारुती कोंडे, विल्सन काळपुंड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शशांक राव म्हणाले, राज्यात 1 मे 2026 पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तो तातडीने रद्द करावा.
या मागणीच्या समर्थनासाठी नागरिक व रिक्षा-टॅक्सी चालकांची स्वाक्षरी मोहीम राबविली जाईल. हे स्वाक्षऱ्या असलेले निवेदन 28 एप्रिलला मंत्री सरनाईक यांना देण्यात येईल. निवेदन दिल्यानंतरही सरकारने अन्यायकारक निर्णय रद्द न केल्यास प्रत्येक जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागामधील प्रमुख ठिकाणी ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक निदर्शने करतील. मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत रोज निदर्शने सुरुच राहतील.
मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या तसेच मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे लाखो ऑटोरिक्षा व टॅक्सीचालकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम होऊन त्यांची कुटुंबे अडचणीत येतील. महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्यास असलेल्या ऑटोरिक्षा, टॅक्सीचे परवाने दिले जातात.
परवाना देताना त्यांची पोलीस पडताळणी केली जाते. त्यानंतर त्यांना परवाने दिले जातात. शहरात परवान्यासाठी 15 हजार रुपये व ग्रामीण भागात 5 हजार रुपये शुल्क भरावे लागते. चालक कर्ज घेऊन ऑटोरिक्षा, टॅक्सी विकत घेतो व सर्व नियमांचे पालन करून वर्षानुवर्षे प्रवाशांना सेवा देतात. जे चालक नियमबाह्य सेवा देत असतील, त्यांच्यावर प्रशासनाने नक्कीच कारवाई करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उद्योगपतींसाठी घेतलेला निर्णय : शशांक राव
याचबरोबर राज्यात बाईक टॅक्सी बेकायदेशीररित्या सुरु आहेत. या सेवेवर कारवाई केली जात नाही. हा निर्णय ॲग्रीगेटर कंपन्या आणि खासगी उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो ऑटोरिक्षा-टॅक्सीचालकांची उपजीविका नष्ट होऊन त्यांची कुटूंबे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप यावेळी शशांक राव यांनी यावेळी केला.