मुंबई : इंडियन केमिकल काउन्सिलने महाराष्ट्र सरकारसोबत मिळून केमिकल उद्योगासाठी दूरदृष्टी असलेले धोरण तयार करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या धोरणातून भविष्यातील केमिकल पार्क, पायाभूत सुविधा आणि आवश्यक गुंतवणूक यांची रूपरेषा ठरवता येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राला प्लग-अँड-प्ले पायाभूत सुविधांसह नवीन केमिकल हब विकसित करण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडिया केमिकल इंडस्ट्री आउटलुक कॉन्फरन्सच्या विशेष सीईओ राउंडटेबलमध्ये ते बोलत होते. त्यांनी देश-विदेशातील प्रमुख केमिकल आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांच्या 100 हून अधिक सीईओसोबत संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, केमिकल क्षेत्र महाराष्ट्राच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देत आहे. व्यवसाय सुलभता वाढवणे, खर्च कमी करणे, पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया वेगवान करणे आणि उत्पादन क्षेत्र अधिक बळकट करणे यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयसीटी, एलटीआय आणि आयटीआयसारख्या संस्थांसोबत उद्योग-शैक्षणिक सहकार्य वाढवले जाईल असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएसएमई क्षेत्राची भूमिका देखील अधोरेखित केली. या परिषदेत इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे एमेरिटस प्रोफेसर ऑफ एमिनन्स, एम एम शर्मा, आयसीसीच्या अध्यक्ष रम्या भरथराम, आयसीसी उपाध्यक्ष समीर सोमैया, तसेच अतिरिक्त उपाध्यक्ष जयंत ढोबले, उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेते बिमल गोकुलदास, रवी गोयनका, राजेंद्र वी गोगरी आणि अलेक्जेंडर गेर्डिंग यांनीही आपले विचार मांडले.