Food adulteration action pudhari photo
मुंबई

Food adulteration action : शेतमालात भेसळ आढळल्यास परवाना रद्द करा

पणन संचालकांचे निर्देश, आंब्यांवर केमिकल स्प्रे फवारणीची दखल

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : बाजार आवारात विकल्या जाणाऱ्या फळे, भाज्या, मसाले आणि सुकामेवा यामध्ये भेसळ करणे, रंग वाढवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्याचा प्रकार आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे आदेश पणन संचालक शरद जरे यांनी सर्व बाजार समित्यांना दिले आहेत.

एपीएमसीतील आंब्यावर केमिकल स्प्रेने फवारणी प्रकरणाची जरे यांनी गंभीर दखल घेतली. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव आणि सभापतींना शेतमालाची वारंवार काटेकोर तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

शेतमाल खरेदी-विक्री संबंधाने भेसळ टाळण्यासाठी, वजन मापे याबाबत तक्रारी उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी. फळे कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी आणि त्यांची गोडी वाढविण्यासाठी कृत्रिम रसायनांचा वापर करणे, फळे-भाजीपाला व अन्नधान्य यांना कृत्रिमरित्या रंगविणे, फळे-भाजीपाला व इतर शेतीमाल दिर्घकाळ टिकविण्यासाठी तसेच आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणे इत्यादी बाबी टाळण्यासाठी वेळोवेळी परवाना धारक व्यापारांची काटेकोरपणे तपासणी करून आवश्यक उपाययोजना करावी.

दैनंदिन भाजीपाला, फळे, फुले यांची विक्री, वाहतूक, साठवण यासाठी विहीत जाडीपेक्षा कमी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून पर्यावरणपूुरक साहित्याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. घातक रसायनांचा वापर केला असल्याचा संशय असल्यास अशा शेतमालाच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय साधून दोषींवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अन्वये कारवाई प्रस्तावित करावी असे निर्देश शरद जरे यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT