मुंबई : राज्यातील रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांमधील नियमभंगाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते जून २०२६ या तीन महिन्यांत राज्यातील ३८ संस्थांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ३४ परवाने निलंबित करण्यात आले असून चार परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, कारवाईत २३ रक्तकेंद्रे आणि १५ रक्त साठवणूक केंद्रांचा समावेश आहे. त्यापैकी २१ रक्तकेंद्रे व १३ रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर दोन रक्तकेंद्रे आणि दोन रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले.
तपासणीत परवान्याच्या अटींचे उल्लंघन, गुणवत्ता व्यवस्थापनातील त्रुटी, अभिलेखांतील विसंगती, रक्त साठवणुकीच्या मानकांचे पालन न करणे तसेच औषधे व प्रसाधने अधिनियमातील नियमांचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. राज्यात सध्या ४१३ परवानाधारक रक्तपेढ्या आणि ४६८ रक्त साठवणूक केंद्रे कार्यरत असून त्यांची नियमित व आकस्मिक तपासणी केली जात असल्याचे एफडीएने स्पष्ट केले.
मुंबईतील माया ब्लड सेंटर आणि सर जे. जे. महानगर रक्तकेंद्र येथे गंभीर अनियमितता आढळल्याने त्यांच्या परवान्यांबाबत कठोर निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुण्यातील पाटील हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर आणि भिवंडीतील आधार ब्लड स्टोरेज सेंटरचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.
रक्त हे जीवनावश्यक असून त्याच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. यॅलेसेमिया, हिमोफिलिया, कर्करोग, अपघातग्रस्त आणि शस्त्रक्रिया रुग्णांसाठी सुरक्षित रक्त उपलब्ध राहावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.