मुंबई: दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या अर्थसाहाय्यात वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे 12 वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्याच्या अर्थसाहाय्यात 500 ते 1,200 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
उच्च माध्यमिक परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना या सुधारित योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठ, संस्था, शिक्षण मंडळाला भरावे लागणारे शुल्क, प्रवेश फी, ट्युशन फी, नोंदणी फी, खेळ, युनियन , लायब्ररी, मॅगझिन, वैद्यकीय तपासणी यासारख्या इतर द्याव्या लागणाऱ्या शुल्कासाठी रक्कम मंजूर करण्यात येणार आहे.
याशिवाय शिक्षण शुल्काव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना वित्तीय साहाय्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार गट 1 अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी, पदव्युत्तर डिप्लोमासाठी निवासी विद्यार्थ्यास 1,200 ऐवजी 1,700 रुपये, तर अनिवासी विद्यार्थ्याला 550 ऐवजी 900 रुपये वित्तीय साहाय्य मिळेल.
गट 2 अंतर्गत इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निवासी विद्यार्थ्यास 820 ऐवजी 1,200 रुपये, तर अनिवासीसाठी 530 ऐवजी 850 रुपये देण्यात येतील. गट 3 अंतर्गत वरील दोन्ही गटांत समाविष्ट नसलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवासी विद्यार्थ्यास 820 ऐवजी 1,200 रुपये, तर अनिवासीसाठी 530 रुपयांच्या ऐवजी आता 850 रुपये मिळतील.
गट 4 अंतर्गत इयत्ता दहावीनंतरच्या पदवीतर डिप्लोमांसाठी निवासी विद्यार्थ्याला 570 ऐवजी 1,100 रुपये, तर अनिवासीसाठी 300 ऐवजी 800 रुपये वित्तीय साहाय्य देण्यात येईल.
याव्यतिरिक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकल्प, टंकलेखन, छपाई आणि पत्रव्यवहार, पुस्तकासाठी म्हणून आता 1 हजार 800 रुपये (प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादेत) तर अभ्यास दौऱ्यासाठी 1,500 रुपये आणि शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती संपूर्ण रक्कम मिळणार आहे. याशिवाय अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता म्हणून गट 1, 2, 3 साठी दरमहा तीनशे आणि गट 4 साठी 225 रुपये दरमहा मिळणार आहेत.