

मुंबई: भेंडीबाजार परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणातील गूढ अधिकच वाढले झाले असून अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) प्रयोगशाळेतील नमुन्यांचे अहवाल गुरुवारी अपेक्षित आहेत.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे. मृतांच्या हृदय, आतडे आणि मेंदूच्या काही भागांवर हिरव्या रंगाचे पॅच आढळले. मात्र, हे डाग कलिंगड किंवा बिर्याणी सेवनामुळे झाले नसल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्यापही अस्पष्टच आहे.
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, बिर्याणी आणि कलिंगड सेवनादरम्यान अन्य काही पदार्थ सेवन करण्यात आले असू शकतात. या शक्यतेच्या अनुषंगाने तपासाची व्याप्ती वाढवली आहे.एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांच्या घरातून विविध अन्नपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले.
यात अर्धवट खाल्लेले कलिंगड, बिर्याणी व पुलावाचे अवशेष, कच्चा तांदूळ तसेच बिर्याणी मसाला, हळद, तिखट, मीठ यांसारखे मसाले यांचा समावेश आहे. याशिवाय अर्धवट खजूर, पिण्याचे पाणी आणि दालचिनी मिसळलेले पाणी यांचेही नमुने कलिना प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. हे अहवाल आज प्राप्त होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
भेसळ किंवा विषारी घटकांची खात्री करण्यासाठी फॉरेन्सिक व शवविच्छेदन अहवाल तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. सर्व अहवालांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले