मुंबई : विविध शासकीय योजनांच्या ऑनलाईन अंमलबजावणीत वारंवार अडथळा ठरणाऱ्या ‘बँडविड्थ’च्या समस्येवर आता प्रभावी तोडगा काढला जाणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रक्रियेत अचानक वाढणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकमुळे प्रणाली कोलमडण्याचे प्रकार घडतात. अशा परिस्थितीत, अत्याधुनिक इंटरकनेक्टिव्हिटी आणि तत्काळ बँडविड्थ वाढविण्याची क्षमता असलेली डेटा सेंटर्स शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.
जागतिक स्तरावरील आघाडीची डेटा सेंटर कंपनी ‘इक्विनिक्स’च्या मुंबईतील ’एमबी3’ या पहिल्या स्वमालकीच्या डेटा सेंटरचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी करण्यात आले.
मुंबईत 3.7 एकरवर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात कंपनीने 750 दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे 6 हजार कोटी रुपये) इतकी मोठी गुंतवणूक केली आहे. हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर तिथे 4 हजार 200 हून अधिक कॅबिनेट्सची क्षमता उपलब्ध असेल. हे केंद्र केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानानेच सुसज्ज नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवांसाठीही सक्षम आहे. हायब्रिड मल्टी-क्लाउड सुविधेमुळे हे केंद्र जगभरातील 11 हजार ग्राहकांशी जोडले जाणार आहे.
दरम्यान, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा भाग म्हणून या डेटा सेंटरसाठी लागणारी 60 टक्के ऊर्जा सौर प्रकल्पातून मिळविली जात आहे. यासाठी यवतमाळ येथे 26.6 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करतानाच ऊर्जेची शाश्वतता जपण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दिलासा ः मुख्यमंत्री
शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी बँडविड्थ वाढवणे गरजेचे आहे. इक्विनिक्सच्या या प्रगत केंद्रामुळे सरकारी प्रणालींची कार्यक्षमता वाढेल आणि सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.