नवी मुंबई : मुंबई एपीएमसीत सोमवारी पहिल्यांदाच कोकणातून हापूसचा हंगाम सुरु झाल्यानंतर सहा हजार पेट्यांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत पाच पेटीपासून दीड ते दोन हजार पेट्यांची आवक डिसेंबर अखेरपासून14 मार्चपर्यंत झाली. मात्र गुढीपाडव्याच्या पाच दिवस आधी मोठी आवक झाली. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक खूपच अल्प प्रमाणात आहे.
सोमवारी बाजारात एका पेटीसाठी 3 हजार ते 9 हजार दर होता. विशेष म्हणजे परराज्यातील हापूसच्या 10 हजार 520 पेट्यांची आवक झाली.
मागील काही दिवसात कोकणातून मुबलक येणारा आंबा आता नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दाखल होऊ लागला आहे. रविवारी बाजार बंद असल्याने सोमवारी हापूसची एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक झाली. हीच आवक उद्या आणि परवा अशी सुरु राहिली तर गुढीपाडव्याला बऱ्यापैकी प्रमाणात हापूस विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.
सध्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आवक सुरु झाली आहे. पुढील काळात आवक जरी वाढणार असली तरी, दर मात्र वरचढ राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. कारण मागील काही दिवसात वातावरणात सतत होणारा बदल,पडणारे धुके आणि तापमानामुळे आंब्यावर परिणाम होऊन आंबा खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जरी आंब्याची आवक वाढली तरी दरात कोणताही फारसा फरक होईल असे आत्ता
तरी वाटत नाही. कारण आंब्याचे झालेले नुकसान पाहता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात निर्यात बंद असल्याने शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे.