मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे यांच्या सहकारी, संयुक्त महाराष्ट्र चळवळील जेष्ठ शाहीरा केशर जैनू चांद यांचे आज (दि ५) पहाटे मुंबई येथील निवास स्थानी वृध्दापकाळाने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा (शाहीर निशांत), सून, नातवंडे असा परिवार आहे.
केशर जैनू चांद यांनी लोकशाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व पती शाहीर जैनू चांद यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत व गिरणी कामगारांच्या चळवळीत सांस्कृतिक प्रबोधनाचे मोठे कार्य केले होते. अमर शेख यांच्या स्मृती दिनी २९ सप्टेंबर रोजी "दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती" तर्फे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्यासाठी लिहिलेले विशेष गाणे गायीले होते.
केशर जैनू चांद यांच्या निधनामुळे पुरोगामी, समतावादी सांस्कृतिक चळवळीचा दुवा निखळला असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, लोक सांस्कृतिक मंच, जाती अंत संघर्ष समिती, जनवादी लेखक संघ, प्रगतीशील लेखक संघ आदी संघटनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले आहे.
हेही वाचा :