मुंबई : कांदिवली (पूर्व) येथील समतानगरमधील म्हाडा संकूलाच्या मध्यम उत्पन्न गटाच्या 22 इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम 1 एप्रिल पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. या कामाच्या प्रगतीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली. तसेच या कामात विलंब झाल्यास विकासकावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कांदिवली (पूर्व) येथील समता नगरमधील 22 मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आ. श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. 2017 मध्ये करार होऊनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. या प्रश्नावरून भाजप गटनेते प्रवीण दरेकर, आ. भाई जगताप, आ. अनिल परब, आ. शशिकांत शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले. विकासकाकडून राज्यमंत्री व म्हाडा अधिकाऱ्याच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली जात असल्याने विकासकावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.
समतानगर येथील प्रकल्पासंदर्भात राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या प्रकल्पातील 318 निष्कासित सदनिकाधारकांपैकी 310 जणांचे भाडे मार्च 2026 पर्यंत देण्यात आले असून उर्वरित आठ जणांचे भाडे देण्याचे आदेशही देण्यात येतील. तसेच दरवर्षीचे भाडे आगावू देण्याबाबत सूचित केले जाईल, असे आश्वासन दिले, असेही मंत्री शंभूराज देसाई म्हणाले,
भाडेकरूंना देय असलेल्या भाड्याबाबत कोणतीही तक्रार राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. तसेच अधिवेशन संपल्यानंतर सर्व संबंधितांची या विषयी पुन्हा बैठक घेतली जाईल. या बैठकीस लोकप्रतिनिधी, म्हाडा अधिकारी तसेच गृहनिर्माण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, भाडेकरूंचे प्रतिनिधी यांनाही निमंत्रित केले जाईल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.