मुंबई / ठाणे : कळवा, मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान रेल्वे रुळाचा एक वळण-पट्टा सध्या मृत्यूचा सापळा झाल्याची जोरदार चर्चा आहे. याच वळणावर गेल्या १० ते १५ दिवसांत ५ लोकांचा पडून मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या वळण मार्गात रेल्वे डब्याला दणके लागतात अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. गुरुवारी सकाळी पुन्हा याच वळण-पट्ट्यावर लोकलमधून एक महिला पडल्याची घटना घडली. दरम्यान, असा कोणताही धोकादायक वळण-पट्टा येथे नसल्याचे सांगत पुन्हा मध्य रेल्वेने स्वतःचे हात झटकले आहेत.
कळवा,मुंब्रा,दिवा परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत काही दिवसांपूर्वीच रेल्वे प्रवासी संघाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच वळणांवर लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या सर्व घटना ताज्या असताना आज गुरुवारी सकाळी ७.५६ वाजता डोंबिवलीकडे जाणारी लोकल दिवा स्थानकातून पुढे मुंब्राच्या दिशेने जात असताना गर्दीमुळे दरवाजाला लटकलेल्या एका महिलेचा अचानक तोल गेला आणि ती लोकलमधून खाली पडली. त्याचवेळी दुसऱ्या रुळांवर थांबलेल्या एका लोकलमधील एका महिलेने डब्यातून खाली उतरून मोटरमनच्या निदर्शनास ही घटना आणून दिली.
तसेच लोकलमधून पडलेली महिला रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन अडकली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र याच वळण- पट्ट्यावर लोकलच्या सुरक्षिततेचा प्रश्न नेमका कोणत्या कारणामुळे निर्माण झाला आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे. महिलेची प्रकृती ठीक असून तिने स्वतःहून कोणतीही तक्रार रेल्वे पोलिसांकडे केलेली नाही. लोकलमधील गर्दीत सहप्रवाशांबरोबर त्यांचे जागेवरून भांडण सुरू होते. तसेच लोकल थांबलेली असताना त्या पडल्या आहेत, अशी वस्तुस्थिती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून दिसत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.
पंधरवड्यात ५ मृत्यू
कळवा,मुंब्रा,दिवा परिसरात होणाऱ्या या अपघातांबाबत मुंबई रेल्वे प्रवासी संघाने काही दिवसांपूर्वी रेल्वेला जाब विचारला होता. याच वळणांवर गेल्या १४, १५ आणि २८ ऑगस्ट तसेच २ आणि ३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवासी संघाने रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते. विशेष म्हणजे या अपघातांतील ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.