Powai IIT Bombay Student Death
मुंबई: पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेच्या बी.टेक. अभ्यासक्रमातील एका विद्यार्थ्याने शुक्रवारी सायंकाळी वसतिगृहात आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार समजताच कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करीत प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती मागितली.
प्राथमिक माहितीनुसार, हा विद्यार्थी शुक्रवारी परीक्षेला बसला होता. परीक्षा सुरू असताना त्याच्याकडे मोबाइल आढळला. त्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो घेऊन त्यातील प्रश्नांची
उत्तरे मिळवण्यासाठी ‘चॅटजीपीटी’ची मदत घेतल्याचेही समजते. हा प्रकार परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना समजताच त्यांनी या विद्यार्थ्याशी चर्चाही केली.
या कथित गैरप्रकाराबाबत विद्यार्थ्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्याची चर्चा विद्यार्थी वर्गात सुरू असतानाच आत्महत्येचा प्रकार घडला. त्यामुळे परीक्षेत मोबाईल आणि चॅट जीपीटीचा वापर पकडला गेल्यानेच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशी कुजबुज आहे. मात्र, आय आय टी मुंबईकडून याबाबत कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.
परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी वसतिगृहात परतला होता. त्यानंतर सायंकाळी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत प्रशासनाकडे माहिती विचारली. पोलीस तपासानंतरच आत्महत्येची कारणे स्पष्ट होतील, असे आयआयटीतील सूत्रांनी सांगितले.